उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारी २०२५ साठी वारकऱ्यांना टोल माफी, वैद्यकीय सेवा, विमा संरक्षण, रस्त्यांच्या डागडुजीसह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. वारीतील प्रत्येक वारकऱ्यासाठी समूह विमा योजना लागू केली जाणारय.
मुंबई: आषाढी वारी २०२५ पारंपरिक भक्तिभाव, सांस्कृतिक समृद्धी आणि लाखो वारकऱ्यांच्या सहभागाने पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. वारी मार्गावरील वाहनांना टोल माफी, वैद्यकीय सेवा, विमा संरक्षण, तसेच रस्त्यांच्या डागडुजीसह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वारकऱ्यांसाठी "समूह विमा संरक्षण"
वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यासाठी यंदाही शासनाकडून समूह विमा योजना लागू केली जाणार आहे. वारी दरम्यान उद्भवणाऱ्या आकस्मिक घटनांमध्ये वारकऱ्यांना आर्थिक मदतीचा आधार मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
वैद्यकीय सेवा – चालत्या पंक्तीत आरोग्याची साथ
गतवर्षीप्रमाणे यंदाही वारी दरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, कार्डियाक रुग्णवाहिका, आणि तात्पुरती आयसीयू सुविधा पंढरपुरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिंड्यांसोबत सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांना स्वतः पंढरपूरला जाऊन सर्व व्यवस्था तपासण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
वारी मार्गाची डागडुजी आणि सुविधा योजनेची तयारी
मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या वारी मार्गांची तातडीने डागडुजी, मुरूम, खडी आणि डांबरीकरणाच्या कामांसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत. तसेच, पाणीपुरवठा, वीजजोडणी, आणि पालखी तळांवर वॉटरप्रूफ तंबूंची सोय करून वारकऱ्यांना कोणतीही अडचण भासणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.
वारीतील वाहनांना टोलमाफी – महत्त्वाचा निर्णय
वारी मार्गावर पालखी आणि सेवेसाठी चालणाऱ्या वाहनांना टोल माफी दिली जाणार आहे. ही सवलत दरवर्षीप्रमाणे यंदाही लागू होणार असून, याचा लाभ लाखो वारकऱ्यांना मिळणार आहे.
नोडल अधिकारी नेमणार, भोजन आणि परंपरांची काटेकोर अंमलबजावणी
वारीदरम्यान पोलिस आणि प्रशासनामधील समन्वय सुलभ व्हावा यासाठी नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहेत. तसेच, भोजन, विसावा, धार्मिक प्रथा वेळच्या वेळी पार पडाव्यात यासाठी सर्व यंत्रणा सक्रिय राहतील. कुठेही वारी अडथळ्यात येणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे.
यंदाची वारी – स्वच्छ, हरित, निर्मल वारी
शिंदे यांनी यंदाची वारी "स्वच्छ वारी, हरित वारी, निर्मल वारी" म्हणून साजरी होईल, याची ग्वाही दिली. पर्यावरणस्नेही वारीसाठी शासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत.
यंदाची आषाढी वारी केवळ एक धार्मिक यात्रा न राहता, शासनाच्या पुढाकारामुळे एक सुसंगठित, सुरक्षित आणि आरोग्यदायी वारी ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या घोषणेमुळे वारकऱ्यांच्या सोयीसाठी मार्ग मोकळा झाला असून, वारी अनुभव अधिक आनंददायी आणि व्यवस्थित होईल, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.