मुंबईतील गुन्हेगारी जगताला हादरवणाऱ्या कारवायांसाठी प्रसिद्ध असलेले दया नायक यांना सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) पदावर बढती मिळाली आहे. ग्रामीण कर्नाटकातील सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या नायक यांनी धाडसी निर्णयांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मुंबईतील गुन्हेगारी जगताला हादरवणाऱ्या कारवायांमुळे चर्चेत असलेले प्रसिद्ध पोलिस अधिकारी दया नायक यांना सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) पदावर बढती मिळाली आहे.
ग्रामीण कर्नाटकापासून मुंबईपर्यंतचा प्रवास
दया नायक हे मूळचे कर्नाटक राज्यातील करकला तालुक्यातील एन्नेहोल गावाचे रहिवासी. अत्यंत सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या नायक यांनी कठोर परिश्रम, प्रामाणिक वृत्ती आणि धाडसी निर्णयांच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. १९९५ साली त्यांनी मुंबई पोलिस दलात प्रवेश केला आणि अल्पावधीतच त्यांनी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून स्वतःचं नाव कमावलं.
अंडरवर्ल्डला थारा नाही, दया नायक यांच्या ८५ हून अधिक एन्काउंटर
१९९० च्या दशकात आणि २००० च्या सुरुवातीला जेव्हा मुंबई अंडरवर्ल्डच्या सावटाखाली होती, तेव्हा दया नायक यांनी गुन्हेगारी विश्वाला आव्हान देणारे अनेक धाडसी ऑपरेशन केले. २००४ पर्यंत त्यांनी ८५ पेक्षा जास्त एन्काउंटर करत मुंबईतील अनेक कुख्यात गुन्हेगाऱ्यांना कायमचा आळा घातला. त्यामुळे त्यांचं नाव गुन्हेगारांमध्ये भीतीचं आणि नागरिकांमध्ये विश्वासाचं प्रतीक बनलं.
ड्रग्ज माफियांविरोधात निर्णायक लढा
अलीकडच्या काळात दया नायक यांनी मुंबईतील ड्रग्ज माफियांविरोधात प्रभावी मोहीम राबवली. उपनगरांमध्ये सक्रिय असलेल्या अंमली पदार्थांच्या रॅकेटवर त्यांनी धडक कारवाई करून अनेक नेटवर्क्स उद्ध्वस्त केली. त्यांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) मध्येही काम केलं असून, संघटित गुन्हेगारीच्या विरोधातील त्यांच्या कारवायांमुळे त्यांचं कौतुक केलं जातं.
पदोन्नती म्हणजे कर्तृत्वाची पावती
दया नायक यांची एसीपी पदावर झालेली बढती ही केवळ एक पदोन्नती नाही, तर गेल्या अनेक वर्षांतील त्यांच्या निष्कलंक, समर्पित आणि प्रभावी सेवेला दिलेला सन्मान आहे. संघटित गुन्हेगारी, अंडरवर्ल्ड, आणि ड्रग्ज जाळ्याविरुद्ध लढा देणाऱ्या या 'खऱ्या हिरो'ला आज संपूर्ण महाराष्ट्र सलाम करत आहे.
दया नायक यांचा प्रवास हा धैर्य, निष्ठा आणि लोकसेवेच्या आदर्शाचा प्रेरणादायक मार्ग आहे. एसीपी पदावरून ते आणखी मोठी जबाबदारी सांभाळणार आहेत, आणि भविष्यातही त्यांनी गुन्हेगारीविरोधात अधिक तीव्र आणि प्रभावी लढा उभारावा, हीच अपेक्षा आहे.