बारामती तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करून पंचनामे आणि मदतीचे निर्देश दिले.
बारामती: मागील काही दिवसांपासून बारामती तालुक्यावर निसर्गाचा रोष ओढवला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दोन दिवसांमध्ये दुसऱ्यांदा पाहणी दौरा केला.
निरा डावा कालवा फुटला, अनेक कुटुंबांचे संसार पाण्यात
बारामतीतून वाहणारा निरा डावा कालवा फुटल्यामुळे अनेक घरात व शेतांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेक कुटुंबांना घरातील सामानाची, तर शेतकऱ्यांना पिकांचे आणि जमिनीचे मोठे नुकसान सहन करावे लागले. या आपत्तीची गंभीर दखल घेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले असून, नुकसानीच्या भरपाईसाठी मदतीचे निर्देश दिले आहेत.
घरात पाणी घुसलेल्या कुटुंबांना १० हजारांची तात्काळ मदत
ज्या कुटुंबांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे, त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. तर, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून, नुकसानाच्या प्रमाणानुसार योग्य ती आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सिद्धेश्वर निंबोडी आणि इतर गावांची पाहणी
पवार यांनी सिद्धेश्वर निंबोडी गावासह तालुक्यातील इतर गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पूरग्रस्त रस्ते, ब्रीज, घरं, वीज खांब आणि वाहून गेलेले रस्ते यांची पाहणी केली. त्यांनी थेट शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांची व्यथा समजून घेतली. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशा स्पष्ट सूचना पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
“शेतकऱ्यांचे नुकसान मोठं आहे, पण आम्ही त्यांच्यासोबत आहोत” – अजित पवार
पावसामुळे राज्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, "हे एका झटक्यात भरून निघणार नाही, पण सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे", असे भावनिक शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उच्चारले. त्यांनी पुढे सांगितले की, "शक्य तेवढी मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पंचनाम्यांचे काम सुरू असून, कोणाचाही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल."
बारामतीत आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिक आणि शेतकरी संकटात सापडले आहेत, पण राज्य सरकार त्यांच्या मदतीसाठी तत्पर आहे. अजित पवार यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा आणि दिलेल्या तात्काळ मदतीमुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.