सार

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रविवारी (४ मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

मुंबई - शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रविवारी (४ मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. ही भेट संजय राऊत यांचे आगामी पुस्तक ‘नरकातील स्वर्ग’ यांच्या प्रकाशन समारंभाचे औपचारिक निमंत्रण देण्यासाठी होती. यासंदर्भातील माहिती स्वतः शरद पवार यांनी समाजमाध्यमांवरून शेअर केली आहे.

पुस्तकाचे निमंत्रण आणि विविध चर्चांना उधाण

या भेटीनंतर शरद पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर फोटो शेअर करत म्हटले, “राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण दिले. या भेटीदरम्यान वन्यजीवनावर आधारित लेखक रोहन तावरे यांच्या पुस्तकावर चर्चा झाली, तसेच राज्य व देशातील विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवरही विचारमंथन झाले.”

शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या पुढील कार्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छाही दिल्या.

 

Scroll to load tweet…

 

पुस्तक प्रकाशन समारंभ कधी आणि कुठे?

संजय राऊत लिखित ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ १७ मे २०२५ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, सुप्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

‘नरकातील स्वर्ग’ – तुरुंगातील अनुभवांची प्रामाणिक कथा

‘नरकातील स्वर्ग’ हे पुस्तक संजय राऊत यांना दोन वर्षांपूर्वी ईडीने केलेल्या अटकेनंतर त्यांनी तुरुंगात घालवलेल्या जवळपास १०० दिवसांच्या अनुभवावर आधारित आहे. राऊत यांनी म्हटलंय की, हे पुस्तक सरकार, तपास यंत्रणा आणि प्रशासन यांच्याशी संबंधित अनेक गोष्टींचा उलगडा करतं. मात्र त्यांनी स्पष्ट केलं की, “हे पुस्तक कोणताही गौप्यस्फोट करण्यासाठी नाही. हे एक जीवनानुभव कथन आहे. जे अनुभवलं, ते प्रामाणिकपणे मांडलं आहे. त्याला सत्यकथन म्हणावं.”

हे पुस्तक मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये प्रकाशित होणार आहे. हिंदी आणि इंग्रजी अनुवादित आवृत्त्यांचं प्रकाशन दिल्लीमध्ये होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी यापूर्वी दिली होती.

राजकीय आणि साहित्यिक वर्तुळात उत्सुकता

या पुस्तकामुळे संजय राऊत पुन्हा एकदा केंद्रस्थानी येणार आहेत. तुरुंगातील अनुभव आणि प्रशासनावरील भाष्यामुळे हे पुस्तक केवळ साहित्यिकदृष्ट्याच नव्हे तर राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचं मानलं जात आहे. राजकीय विरोधक, प्रशासन, आणि माध्यम क्षेत्रातील व्यक्तींमध्ये या पुस्तकाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकातून उलगडणाऱ्या सत्यकथनाचा खरा अर्थ काय, आणि ते राजकीय व सामाजिक क्षेत्रावर किती खोल परिणाम करेल, हे पाहणं रंजक ठरणार आहे.