सार

“गेल्या दहा वर्षांतील प्रत्येक हत्याकांडाला अमित शाह जबाबदार आहेत, तरीही मोदी त्यांना पदावर का ठेवत आहेत?” असा सवाल त्यांनी केला. काश्मीरमध्ये झालेल्या हत्याकांडात २७ लोक ठार झाले असून, त्यापैकी ६ जण महाराष्ट्रातील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई - शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काश्मीरमधील अलीकडील हत्याकांडावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जबरदस्त टीका केली. “गेल्या दहा वर्षांतील प्रत्येक हत्याकांडाला अमित शाह जबाबदार आहेत, तरीही मोदी त्यांना पदावर का ठेवत आहेत?” असा सवाल त्यांनी केला. काश्मीरमध्ये झालेल्या हत्याकांडात २७ लोक ठार झाले असून, त्यापैकी ६ जण महाराष्ट्रातील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"कोणी अडवलं का? मग मारा ना!"

राऊतांनी पुढे अमित शाह आणि राजनाथ सिंह यांच्या पाकिस्तानविरोधी वक्तव्यांवर सवाल उपस्थित केला. “चुन चुन के मारेंगे” आणि “घरात घुसून मारू” असे म्हणणाऱ्यांनी आता कृती का केली नाही? आमच्याच लोकांना चुन चुन के मारले जात आहे, असे राऊत म्हणाले.

"युद्ध केवळ मीडियातच सुरू आहे"

सरकार युद्धाच्या तयारीत आहे असे वाटत नाही. "युद्ध सुरू झाले आहे" असा आभास मीडियामधून दिला जात आहे, पण प्रत्यक्षात काहीही घडत नाही, अशी टीका त्यांनी केली.

"दुःखही दिसत नाही, चिंता तर दूरच"

हल्ल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार दौऱ्यावर जातात, बॉलिवूड कार्यक्रमात सहभागी होतात, उद्‌घाटने करतात, हास्यविनोद करतात. दुःखाची कुठलीही भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही, असे ते म्हणाले.

"विरोधकही गप्प, कीव वाटते"

राऊत यांनी विरोधकांवरही नाराजी व्यक्त केली की, अद्याप कोणत्याही विरोधकांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हे सरकार नसून नराधम आहेत, आणि विरोधकांनी अशा चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालू नये.

------------------------------