शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात अनेक राजकीय गौप्यस्फोट केले आहेत. आज सायंकाळी या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्यावेळीही काही खुलासे होण्याची शक्यता आहे.
मुंबई - शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे ज्येष्ठ खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या बहुचर्चित पुस्तकाचे आज (१७ मे) सायंकाळी ६ वाजता मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात प्रकाशन होणार आहे. या विशेष प्रकाशन सोहळ्याला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार तसेच प्रसिद्ध गीतकार आणि विचारवंत जावेद अख्तर हे उपस्थित राहणार आहेत.
तुरुंगातील १०० दिवस आणि ‘नरकातला स्वर्ग’चा जन्म
पत्राचाळ प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीनंतर संजय राऊत यांना आर्थर रोड कारागृहात जवळपास शंभर दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला. या तुरुंगवासादरम्यानच त्यांनी हे पुस्तक लिहिले. “नरकातला स्वर्ग” या शीर्षकातूनच त्या काळातील कटू अनुभव, मानसिक संघर्ष आणि एक वेगळी वैचारिक जाणीव व्यक्त होत असल्याचे जाणवते.
या पुस्तकात त्यांनी तुरुंगातील अनुभवासोबतच अनेक खळबळजनक राजकीय दावे, सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या गोष्टी आणि काही गौप्यस्फोट सादर केले आहेत. विशेष म्हणजे हे पुस्तक केवळ आत्मकथन नसून एक राजकीय दस्तऐवज ठरू शकते, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
भाजपकडून धमकी मिळाल्याचा गंभीर आरोप
या पुस्तकातील सर्वात गंभीर दाव्यांपैकी एक म्हणजे भाजपकडून दिली गेलेली धमकी. “महाविकास आघाडी सरकार पाडायला मदत करा, नाहीतर तुरुंगात जावं लागेल,” असा इशारा भाजपकडील एका ‘हितचिंतकाने’ दिला होता, असा दावा संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. हा दावा करताना त्यांनी हेही नमूद केलं आहे की, या हितचिंतकाने त्यांच्या भेटीची मागणी करत असेही सांगितले की, “वरून दबाव आहे, परिस्थिती हाताळा.”
ईडी अधिकाऱ्यांवर वरून दबाव होता?
राऊत यांनी आणखी एक खळबळजनक दावा करत म्हटलं आहे की, त्यांच्या अटकेप्रकरणी ईडी अधिकाऱ्यांवरही वरून दबाव होता. एका ईडी अधिकाऱ्याने त्यांना “वरती बोलून घ्या” असा सल्ला दिला होता. मात्र, संजय राऊत यांनी त्यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “माझ्यावर केवळ बाळासाहेब ठाकरेच वरती आहेत.” हे सर्व प्रसंग आणि संवाद पुस्तकात तपशीलवार नमूद करण्यात आले आहेत.
मोदी-शाह यांना मदतीचे बाळासाहेब व पवारांचे संबंध
यापूर्वीही या पुस्तकातील काही भाग प्रसिद्ध झाल्यानंतर संजय राऊत यांच्या दाव्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजवली होती. त्यांनी म्हटले होते की, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी संकटकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मदत केली होती. हे संबंध आणि त्या मदतीचे तपशीलही त्यांनी पुस्तकात दिले आहेत.
राजकीय वर्तुळात चर्चा, जनतेत उत्सुकता
संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकामुळे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात नवा वादळ उठण्याची शक्यता आहे. यातून महाविकास आघाडी सरकारच्या काळातील नाट्य, भाजपशी संबंध, आणि कारवाईमागील राजकीय हेतूंचा पर्दाफाश केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या पुस्तकाकडे राजकीय वर्तुळासह वाचकवर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.
एकीकडे राजकीय संघर्ष, दुसरीकडे व्यक्तिगतरित्या सोसलेली परवड आणि त्यातून साकारलेलं आत्ममंथन, अशा अनुभवातून तयार झालेलं ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक केवळ संजय राऊत यांचं आत्मकथन नसून, सध्याच्या राजकारणाचा आरसा ठरण्याची शक्यता आहे.