सार

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दादर चौपाटीवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा बंदोबस्त कोणत्याही विशिष्ट धमकीच्या आधारावर नसून, संभाव्य धोक्यांना प्रतिबंध करण्यासाठी करण्यात आला आहे.

मुंबई – 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर देशाच्या सीमारेषेवर तणाव निर्माण झाला असताना आता देशाच्या महानगरांतही सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री दादर चौपाटी परिसरात मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करत चोख बंदोबस्त ठेवला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

विशेष म्हणजे, ही सुरक्षा तैनाती कोणत्याही विशिष्ट धमकीच्या आधारावर नव्हती, तर संभाव्य धोक्यांचा विचार करून ‘प्रिव्हेन्टिव्ह अ‍ॅक्शन’ म्हणून केली गेल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. देशाच्या पश्चिम किनाऱ्यालगत असलेल्या शहरांमध्ये — विशेषतः मुंबईसारख्या वित्तीय राजधानीत — कोणतीही गफलत न करता सुरक्षेचं कडक जाळं उभं केलं जात आहे.

सध्या पाकिस्तानसह सीमावर्ती परिस्थिती तणावपूर्ण असून, ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवादी संघटनांमध्ये खळबळ माजल्याची शक्यता गृहित धरून मुंबई पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे.

दादर चौपाटीसारख्या गर्दीच्या आणि पर्यटकप्रिय भागात रात्री उशिरापर्यंत पोलिस पेट्रोलिंग सुरू होतं. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहनही प्रशासनाने केलं आहे. कोणतीही संशयास्पद गोष्ट दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.