सार

संभाजी भिडे यांनी ६ जून रोजी साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा बंद करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते हा सोहळा राजकारणासाठी वापरला जात असून महाराजांचा राज्याभिषेक तिथीनुसार साजरा केला पाहिजे. यावरून राजकीय नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे.

कोल्हापूर: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी ६ जून रोजी रायगडावर साजरा होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, हा सोहळा राजकारणासाठी वापरला जात असून, महाराजांचा राज्याभिषेक तिथीनुसार साजरा केला पाहिजे

भिडे म्हणाले, "६ जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष केला पाहिजे. ७६ वर्षे झाली तरीही आपलं मानसिक अधिष्ठान ब्रिटिशांकडे स्वाधीन ठेवलंय. महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या तिथीप्रमाणेच शिवराज्याभिषेक स्मरण दिन केला पाहिजे ." 

या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्या स्मृतींवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे ." 

शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी सांगितले की, "शिवराज्याभिषेक हा ६ जून रोजी साजरा होतो, यावर कोणताही वाद नको. तारखेवर बंधन घालणे योग्य नाही. यावर एक समिती नेमली जाईल आणि मुख्यमंत्री याबाबत अंतिम निर्णय घेतील ." 

वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून वाद

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबाबतही भिडे यांनी मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, “रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात येऊ नये. या कुत्र्याचं राजकारण करू नये .” छत्रपती संभाजीराजे यांनी वाघ्याच्या समाधीला विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर भिडे यांच्या मागणीमुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

हुंडा प्रथेबाबत भिडेंची भूमिका

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणावर भाष्य करताना भिडे म्हणाले, "हुंडा देण्याची प्रथा ही पूर्णपणे बंद केली पाहिजे. पण हे करताना राजकारण करता कामा नये ."