स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधातील गुन्ह्यात नवीन वळण आले आहे. सावरकर कुटुंबीयांनी त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे.
पुणे – राजकीय सभांमध्ये झालेले वक्तव्य आता थेट न्यायालयाच्या दारात पोहोचले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधातील गुन्ह्यात आता नवीन वळण आलं आहे. सावरकर कुटुंबाचे वकिल अॅड. भरत मंगेशकर यांनी पुणे न्यायालयात राहुल गांधींचा जामीन रद्द करण्याची मागणी करत अर्ज दाखल केला आहे.
सावरकरांबद्दल अपमानकारक वक्तव्य करून राहुल गांधी यांनी जाणीवपूर्वक भावना दुखावल्या असून, जामीन मिळूनही त्यांनी पुन्हा तोच मुद्दा उपस्थित करून न्यायालयाचा अनादर केल्याचं अॅड. मंगेशकर यांचं म्हणणं आहे. त्यामुळे, या जामिनाच्या अटींचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या घडामोडींमुळे राजकीय आणि कायदेशीर वातावरण पुन्हा तापले असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मानहानी यामधील सीमारेषा न्यायालय ठरवणार का, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काँग्रेसने हे संपूर्ण प्रकरण राजकीय सूड म्हणून सादर केलं असून, राहुल गांधी देशातील ऐतिहासिक सत्य मांडत आहेत, असं पक्षाचं म्हणणं आहे.