त्यांनी एका अनोळखी महिला अनुष्का यादवसोबतचा फोटो शेअर करत गेल्या १२ वर्षांपासून तिच्याशी प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली होती. मात्र, काही तासांतच त्यांनी ती पोस्ट हटवून आपले फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचा दावा करत साऱ्या प्रकरणाला कलाटणी दिली.
पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेज प्रताप यादव यांनी शनिवारी (२४ मे) फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट शेअर करत राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवली. या पोस्टमध्ये त्यांनी एका अनोळखी महिला अनुष्का यादवसोबतचा फोटो शेअर करत गेल्या १२ वर्षांपासून तिच्याशी प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली होती. मात्र, काही तासांतच त्यांनी ती पोस्ट हटवून आपले फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचा दावा करत साऱ्या प्रकरणाला कलाटणी दिली.
फेसबुकवर शेअर केलेल्या त्या पोस्टमध्ये तेज प्रताप यांनी लिहिले होते की, “मी गेली १२ वर्षे अनुष्का यादव हिच्याशी प्रेमसंबंधात आहे आणि आमचं नातं अत्यंत गंभीर आणि समर्पित आहे.” या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चर्चेचा भडका उडाला. अनेकांनी या दाव्याला गांभीर्याने घेतले, तर काहींनी याला राजकीय स्टंट म्हणून हिणवले.
पोस्ट हटविल्यानंतर काही वेळातच तेज प्रताप यादव यांनी एक्स (माजी ट्विटर) या माध्यमातून आपली बाजू मांडली आणि फेसबुकवरची ती पोस्ट खोटी असून त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी लिहिले,
"माझे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक करण्यात आले आहेत. माझे फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट करून मला आणि माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्या समर्थकांनी आणि शुभचिंतकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी मी विनंती करतो."
तेज प्रताप यांनी याही पुढे जाऊन फेसबुकवर शेअर करण्यात आलेला फोटो एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेला असल्याचा दावाही केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा सगळा प्रकार त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या बदनाम करण्यासाठी रचलेला कट आहे.
मात्र, यानंतर प्रकरण अधिक गहिरं होत गेलं. सोशल मीडियावर तेज प्रताप यादव आणि अनुष्का यादव यांचे आणखी काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यात दोघे एकत्र दिसत आहेत. विशेष म्हणजे, काही व्हिडिओजमध्ये दोघांचे लग्नसोहळ्यासारखे दृश्य पाहायला मिळाले, ज्यामुळे हॅकिंगच्या दाव्याबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.