सार

भारत राष्ट्र समिती (बीआरएस) च्या विधान परिषदेतील आमदार के. कविता यांनी गुरुवारी पक्षातील काही नेत्यांवर थेट आरोप केले आहेत. याशिवाय पक्ष भाजपामध्ये विलीनीकरण करण्यावरही प्रश्न उपस्थितीत केला आहे. 

Delhi : भारत राष्ट्र समिती (बीआरएस) च्या विधान परिषदेतील आमदार के. कविता यांनी गुरुवारी पक्षातील काही नेत्यांवर थेट आरोप करत, पक्षाला भाजपमध्ये विलीन करण्याचा डाव रचला जात असल्याचा गौप्यस्फोट केला. त्यांनी यावेळी स्पष्ट केलं की, “हा डाव केवळ भूतकाळात नव्हता, तर तो अजूनही सुरू आहे.”कविता यांनी आपले बंधू व बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामा राव (केटीआर) यांचे नाव न घेता निशाणा साधला. “माझ्या तुरुंगवासादरम्यान (दिल्ली दारू घोटाळा प्रकरण) माझ्यासमोर भाजपमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, पण मी तो स्पष्टपणे फेटाळला,” असा दावा त्यांनी केला.

माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना कविता यांनी पक्षातील अन्य नेत्यांवरही नाराजी व्यक्त केली. “सोशल मीडिया आणि काही स्थानिक वृत्तपत्रांतून माझी बदनामी सुरू होती, पण केवळ केसीआर वगळता कोणीही माझ्या बचावासाठी पुढे आले नाही,” असा त्यांनी सवाल उपस्थित केला.कविता यांनी भाजपवर टीका करत सांगितले, “भाजप तेलंगणातील संसाधनांवर डोळा ठेवून बसले आहे. त्यांच्यावर अंकुश ठेवण्याऐवजी काहीजण बीआरएसलाच त्यांच्या हाती सोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, बीआरएस म्हणजे तेलंगणातील जनतेसाठी श्रीरामरक्षा आहे, आणि मी कोणत्याही विलीनीकरणास कटाक्षाने विरोध केला.”

कविता यांनी अलीकडेच वडील व पक्षप्रमुख केसीआर यांना एक पत्र लिहिलं होतं, जे माध्यमांत लीक झालं. त्यानंतर बीआरएसमधील अंतर्गत मतभेद उघड झाले. “पक्षात काही कट रचले जात आहेत,” अशीही स्पष्ट कबुली त्यांनी यावेळी दिली.

बीआरएस पक्ष

बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती (पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती - टीआरएस) हा तेलंगणातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. २००१ मध्ये केसीआर यांनी स्थापन केलेल्या या पक्षाचा मुख्य उद्देश वेगळं तेलंगणा राज्य निर्माण करणे हा होता. हैदराबाद मुख्यालय असलेला बीआरएस सध्या राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कार्यरत आहे.