PBKS vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कालच्या सामन्यामध्ये दणदणीत विजय झाला. यावेळी विराट कोहलीसह संघातील सर्वच खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. पण विराट आणि अनुष्काचा रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाल्यात.
PBKS vs RCB : जगातील सर्वात मोठ्या चाहतावर्ग असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयपीएल २०२५ मध्ये दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पंजाब किंग्ज विरुद्धच्या क्वालिफायर १ सामन्यात आरसीबीने एकतर्फी विजय मिळवला आणि ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा फायनलमध्ये धडक मारली. या विजयानंतर विराट कोहलीचा मैदानातील जल्लोष आणि अनुष्का शर्माची प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
१०१ धावांत पंजाबची दाणादाण
या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमकता दाखवत पंजाब किंग्जच्या फलंदाजांना एकामागून एक बाद केलं. प्रियांश आर्या केवळ ७ तर प्रभसिमरन सिंग १८ धावांवर माघारी परतले. अखेर पंजाबचा संपूर्ण डाव केवळ १०१ धावांत आटोपला.
पंजाबने दिलेलं छोटं लक्ष्य पार करताना आरसीबीने आत्मविश्वासपूर्ण खेळी केली. विराट कोहलीने १२ धावा करत संघाला चांगली सुरूवात करून दिली, तर फिल सॉल्टने नाबाद ५६ धावा करत सामना ८ गडी राखून जिंकून दिला. विजयाची खात्री होताच विराटने मैदानातच अनुष्काकडे पाहत हाताने 'फक्त एक सामना शिल्लक' असा इशारा केला. अनुष्काने टाळ्यांनी प्रतिसाद देत विराटचं जोरदार कौतुक केलं.
रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबीने लीग फेझमध्ये १४ पैकी ९ सामने जिंकले आणि गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. या हंगामात आरसीबीने आपल्या भक्कम कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता ते जेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहेत.या ऐतिहासिक विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएल २०२५च्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असून, आरसीबी या वर्षी पहिलंवहिलं आयपीएल जेतेपद पटकावेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.