सार

केरळमधील कोचीजवळ एक मालवाहू जहाज, एमएससी ईएलएसए 3 (MSC ELSA 3), 640 कंटेनर बुडाल्याची घटना घडली आहे. यामुळे समुद्रातील पाणी दुषित होण्यासह त्यामध्ये विषारी रसायन मिक्स झाले आहे. 

Kerala News : केरळमधील कोचीजवळ एक लायबेरियन मालवाहू जहाज, एमएससी ईएलएसए 3 (MSC ELSA 3), 640 कंटेनर घेऊन बुडाले आहे. ही घटना 25 मे 2025 रोजी सकाळी घडली. जहाज वेगाने कलंडले आणि उलटून समुद्रात बुडाले. जहाजावर असलेल्या उर्वरित तीन क्रू सदस्यांना भारतीय नौदलाच्या आयएनएस सुजाता (INS Sujata) या जहाजाने वाचवले.

हा सागरी अपघात केवळ मालहानीपर्यंत मर्यादित न राहता पर्यावरणावर गंभीर परिणाम घडवू शकतो. केरळचा किनारी भाग जैवविविधतेसाठी अत्यंत संवेदनशील आहे आणि एक प्रमुख पर्यटन स्थळही आहे. त्यामुळे भारतीय तटरक्षक दलाने प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.

भारतीय तटरक्षक दलाने तेल गळती आणि रासायनिक अपघातांना तोंड देण्यासाठी 'सक्षम' जहाज घटनास्थळी पाठवले आहे.या जहाजात तातडीच्या परिस्थितीसाठी अत्याधुनिक प्रदूषण नियंत्रण उपकरणे आहेत.

इंधन गळतीची शक्यता आणि प्रशासनाची सतर्कता
बुडालेल्या जहाजाच्या टाक्यांमध्ये 84.44 मेट्रिक टन डिझेल आणि 367.1 मेट्रिक टन फर्नेस ऑईल असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्य प्रशासन आणि तटरक्षक दल संवेदनशील समुद्रकिनाऱ्याच्या संरक्षणासाठी पूर्णपणे सज्ज असून प्रदूषण रोखण्यासाठी विविध स्तरांवर समन्वयाने काम सुरू आहे.