अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्दैवी विमान अपघातानंतर, एअर इंडियाने 'AI-171' हा विमान क्रमांक रद्द केला आहे. प्रवाशांना भूतकाळातील कोणत्याही आठवणी त्रास देऊ नयेत यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

नवदिल्ली : अहमदाबादमध्ये २७५ जणांचा बळी घेणाऱ्या दुर्दैवी विमान अपघातानंतर, एअर इंडियाने 'AI-171' हा विमान क्रमांक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एअरलाईन्सच्या प्रवाशांना भूतकाळातील कोणत्याही आठवणी त्रास देऊ नयेत यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. अहमदाबाद ते लंडन गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे विमान आता AI-159 या क्रमांकाने ओळखले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.

महाभयंकर विमान अपघातानंतर विमान कंपन्या विशिष्ट विमान क्रमांक वापरणे थांबवतात, ही एक सामान्य प्रथा आहे, असे सूत्रांनी शनिवारी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले. विमान क्रमांक रद्द करणे हे मृतांना आदरांजली वाहण्याचा एक मार्ग आहे असेही म्हटले जाते.

गुरुवारी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा टेकऑफ झाल्यानंतर काही क्षणातच अपघात झाला. या अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. विमान स्थानिक वैद्यकीय वसतिगृहावर कोसळल्याने वसतिगृहातील अनेकांचाही मृत्यू झाला. बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनरमध्ये १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन होते.

दुर्घटनेनंतर विमान क्रमांक बदलणे ही प्रवाशांना धक्कादायक आठवणी पुन्हा जागृत होण्यापासून रोखण्यासाठी सामान्य पद्धत आहे, असे एका माजी विमान अधिकाऱ्याने सांगितले. "प्रवाशांच्या मनातून दुर्घटनेचा मार्ग वेगळा करण्याचा हा एक मार्ग आहे," असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

दरम्यान, एअर इंडियाच्या AI-171 विमानाच्या अपघाताची कारणे तपासण्यासाठी सरकारने एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. गृहसचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीत नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारतीय वायुसेना आणि विमान वाहतूक तज्ज्ञांचे प्रतिनिधी असतील.

मोठ्या अपघातानंतर विमानांचे क्रमांक बदलणे ही काही नवीन बाब नाही. २०१४ मध्ये मलेशिया एअरलाइन्सचे विमान MH370 बेपत्ता झाल्यानंतर, विमान कंपनीने कुआलालंपूर-बीजिंग मार्गाचा क्रमांक MH318 ने बदलला. त्याचप्रमाणे, २०१८ मध्ये जावा समुद्रात झालेल्या अपघातात विमानातील सर्व १८९ जणांचा मृत्यू झाल्यानंतर लायन एअरने आपला विमान क्रमांक JT610 वरून JT618 वर बदलला.