“मी केवळ पैसा कमावण्यासाठी भारतात आलो नव्हतो, तर मला पाकिस्तानमध्ये दुर्लक्षित वाटू लागलं होतं,” अशी भावनिक कबुली सुप्रसिद्ध गायक अदनान सामी यांनी दिली आहे.
मुंबई - “मी केवळ पैसा कमावण्यासाठी भारतात आलो नव्हतो, तर मला पाकिस्तानमध्ये दुर्लक्षित वाटू लागलं होतं,” अशी भावनिक कबुली सुप्रसिद्ध गायक अदनान सामी यांनी दिली आहे. भारतात २०१६ साली नागरीकत्व मिळवणाऱ्या सामी यांनी अलीकडच्या एका मुलाखतीत आपल्या संघर्षांची आणि भारतातल्या यशस्वी प्रवासाची मनमोकळी कहाणी सांगितली.
पाकिस्तानमध्ये संगीताची दुर्लक्षलेली कहाणी
१९९८ साली काही गाणी रिलीज केल्यानंतर पाकिस्तानमधील संगीतमंडळींनी अदनानला दुर्लक्षित केलं, असा गंभीर आरोप त्यांनी केला. “त्या अल्बमसाठी ना कोणती जाहिरात झाली, ना प्रचार. तो अल्बम आला आणि कोणालाच माहितीही नव्हती. जणू काही तो कधीच अस्तित्वात नव्हता. मी पूर्णपणे तुटलो होतो,” असं ते म्हणाले. त्यावेळी ते कॅनडामध्ये वास्तव्यास होते आणि हा सगळा अपमान पचवत होते. “मला खात्री होती की हे जाणीवपूर्वक केलं गेलं,” असा दावाही त्यांनी केला.
आशा भोसले यांचा निर्णायक सल्ला
या निराशेच्या काळात त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरल्या स्वरसम्राज्ञी आशा भोसले. अदनान सामी आणि आशा भोसले यांनी १९९७ मध्ये प्रसिद्ध झालेलं ‘कभी तो नजर मिलाओ’ हे गीत एकत्र गायले होते. सामी म्हणाले, “मी आशाजींना सांगितलं, ‘मला फार निराश वाटतंय. माझ्या देशातले लोक माझ्याशी काम करायला इच्छुक नाहीत. आपण लंडनमध्ये काहीतरी करूया का?’”
त्यावर आशा भोसले यांनी उत्तर दिलं, “लंडन का? जर तुला खरंच काहीतरी मोठं करायचं असेल, तर मुंबईला ये. इथेच हिंदी संगीताचं केंद्र आहे. इथं जसं काहीतरी यशस्वी होतं, तसं ते जगभर पोहोचतं. ही आहे ती जादूची नगरी.”
“बोरिया-बिस्तर घेऊन मुंबईत आलो”
या प्रेरणेमुळे सामी यांनी भारत गाठला. “मी बोरिया-बिस्तर घेऊन मुंबईला आलो. आशाजी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने मला आपलंसं केलं,” ते सांगतात. केवळ व्यावसायिक सहकार्य नव्हे, तर आशा भोसले यांनी त्यांना रेसिडेन्सीसुद्धा दिली – ती देखील आर. डी. बर्मन यांचं घर. “ते घर म्हणजे एका कलाकारासाठी मंदिरच होतं. मी अतिशय नशीबवान आहे की मला तिथं राहायला मिळालं.”
मुंबईतून मिळालं खरं यश
पाकिस्तानमध्ये दुर्लक्षित राहिलेली गाणी भारतात आल्यानंतर सुपरहिट ठरली. ‘कभी तो नजर मिलाओ’, ‘भीगी भीगी रातों में’, ‘लिफ्ट करादे’ यासारखी गाणी इथं उत्तमरीत्या प्रमोट झाली. “जसं म्हणतात तसं – बाकी सगळं इतिहास बनलं,” सामी म्हणाले.
पाकिस्तानी कलाकारांचं विस्मरण
अदनान सामी यांनी पाकिस्तानी सांगीतिक व्यवस्थेवरही टीका केली. “नुसरत फतेह अली खान, मेहदी हसन, रेश्मा यांना जगभर प्रेम मिळालं. पण त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही. ही एक क्रूर सत्यता आहे. ना सरकारची मदत, ना जनतेची. कलाकारांना विसरलं जातं. अशीच अनेक उदाहरणं आहेत, केवळ गायक नव्हे तर अभिनेतेही.”
मुशर्रफ यांच्या पत्रावर सामींचं उत्तर
२००५ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी सामींच्या वडिलांना एक पत्र पाठवून सामीवर पाकिस्तानचा विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. यावर सामी म्हणाले, “त्या वेळी मी अजूनही पाकिस्तानी नागरिक होतो. भारतीय नागरिकत्व घेतलंही नव्हतं. कोणीतरी चुकीची माहिती दिली आणि त्यावरून सर्वांनी पाठ फिरवली.”
भारत, संगीताचे खरे व्यासपीठ
अदनान सामी यांचं आज भारतात अढळ स्थान आहे. ते म्हणाले, “इथल्या प्रेक्षकांचं प्रेम, संगीताला मिळणारा मान हा इतर कुठेच नाही. मुंबईने मला केवळ घर नव्हे, तर ओळख दिली.”