ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'नरक आणि पाकिस्तान यामध्ये निवड करावी लागली तर मी नरक निवडेन'. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ गीतकार आणि पटकथालेखक जावेद अख्तर यांनी पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत आपले मत स्पष्ट केले आहे. मुंबईतील एका पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना त्यांनी म्हटले, “जर मला नरक आणि पाकिस्तान यामध्ये एक निवड करावी लागली, तर मी नरक निवडेन.”
जावेद अख्तर यांच्यावर दोन्ही बाजूच्या कट्टर विचारसरणीच्या लोकांकडून टीका आणि शिव्यांचा वर्षाव होतो, असे ते म्हणाले. “एक बाजू म्हणते मी काफिर आहे, मला नरकात जायला हवे. दुसरी बाजू म्हणते की मी जिहादी आहे आणि मला पाकिस्तानात जायला हवे. पण माझ्या दृष्टीने जर अशी वेळ आली की मला नरक आणि पाकिस्तान यामध्ये निवड करावी लागली, तर मी ठामपणे नरक निवडीन,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
जावेद अख्तर यांनी असेही सांगितले की, त्यांना एका विशिष्ट मुद्द्यावर आपले मत व्यक्त करायचे होते. त्यामुळे त्यांनी इंग्रजीत एक लेख लिहून त्याचा मराठीत अनुवाद करून घेतला. हा लेख सामना या दैनिकात प्रकाशित व्हावा म्हणून त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी संपर्क केला. “सामनात माझा लेख जसाच्या तसा प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर मी संजय राऊत यांचा 'डोळस भक्त' झालो. 'अंध भक्त' नव्हे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “संपूर्ण जगात सरकार अनेकदा चुकते तेव्हा जेव्हा ती विरोधकांना तुरुंगात टाकते. कारण जेलमध्ये त्यांना विचार करायला भरपूर वेळ मिळतो. सरकारने असं करू नये, त्यांना बाहेरच व्यस्त ठेवलं पाहिजे.” शेवटी जावेद अख्तर यांनी लेखक म्हणून संजय राऊत यांचं स्वागत करत त्यांना लिहित राहण्याचं आवाहन केलं.
जावेद अख्तर यांचे हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरले असून, त्यावरून पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संबंध आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मुद्द्यांवर सार्वजनिक चर्चा रंगण्याची शक्यता आहे.