सार

पाकिस्तानचा एक गुप्तचर भारतीय संरक्षण मंत्रालयाचा अधिकारी असल्याचे भासवत, देशातील पत्रकारांकडून संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत होता. भारतीय गुप्तचर संस्थांनी वेळीच हस्तक्षेप करून ही कारवाई उघडकीस आणली आहे. 

नवी दिल्ली | प्रतिनिधी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव वाढत असताना, आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानचा एक गुप्तचर भारतीय संरक्षण मंत्रालयाचा अधिकारी असल्याचे भासवत, देशातील पत्रकारांकडून संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हा हेर भारतीय मोबाईल नंबर वापरून WhatsApp वर सक्रिय होता आणि त्याचं प्रोफाइल आणि भाषा पूर्णतः एका अधिकृत भारतीय लष्करी अधिकाऱ्यासारखी होती. त्यामुळे तो पत्रकारांशी विश्वास संपादन करून संवाद साधू शकत होता. प्राथमिक माहितीनुसार, त्याने अनेक राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषयांवर पत्रकारांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.

भारतीय गुप्तचर संस्थांनी वेळेवर हस्तक्षेप करत ही कारवाई उघडकीस आणली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या दरम्यान आणि नंतर, माहितीची गोळा प्रक्रिया किती संवेदनशील आणि धोरणात्मक असते, हे या घटनेमधून पुन्हा अधोरेखित झालं आहे. विशेष म्हणजे, भारताच्या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानकडून सुरू असलेले मनोवैज्ञानिक युद्ध आता सोशल मीडिया आणि मेसेजिंग अ‍ॅप्सपर्यंत पोहोचले आहे.

संबंधित हेराने पत्रकारांकडून फक्त लष्करी हालचालीच नाही, तर संरक्षण धोरणांबाबत विश्लेषण, अंतर्गत चर्चांबाबतही माहिती मागण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती गुप्तचर संस्थांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील पत्रकारांना आणि माध्यम संस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियावर ओळख पटविण्यापूर्वी कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संवाद साधताना अधिक काळजी घेणे आवश्यक ठरत आहे.