सार

पाकिस्तानमधील बलुच लोकांना वेगळा प्रांत हवा आहे. त्यासाठी त्यांचा पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी लष्करासोबत रक्तरंजित लढा सुरु आहे. विशेष म्हणजे बलुच मराठा समाजाचा याला पाठिंबा असल्याचे सांगितले जात असून आजही त्यांची लढाऊ वृत्ती दिसून येत आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानमधील बलुच लोकांना वेगळा प्रांत हवा आहे. त्यासाठी त्यांचा पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी लष्करासोबत रक्तरंजित लढा सुरु आहे. विशेष म्हणजे बलुच मराठा समाजाचा याला पाठिंबा असल्याचे सांगितले जात असून आजही त्यांची लढाऊ वृत्ती दिसून येत आहे.

पानिपतचे तिसरे युद्ध ही केवळ एक ऐतिहासिक घटना नाही, तर मराठा साम्राज्याच्या घसरणीची सुरुवात मानली जाते. १७६१ मध्ये अफगाण सम्राट अहमदशाह अब्दालीशी झालेल्या या भयंकर लढाईत मराठ्यांना दारुण पराभव पत्करावा लागला. लाखो सैनिक शहीद झाले, अनेक बेपत्ता झाले, आणि मराठा सत्तेचे वैभव अचानक मावळत्या सूर्याप्रमाणे झाकोळून गेले. पण याच युद्धाने एक वेगळी आणि फारशी ज्ञात नसलेली शोकांतिका जन्माला घातली, बलुचिस्तानात आजही अस्तित्वात असलेले 'मराठा समाज'.

जखमी, शरण, आणि विस्थापित

पानिपतच्या रणांगणात अनेक मराठे कामी आले, काही शरण आले, आणि काहींना बंदी बनवून अफगाणिस्तानात नेण्यात आले. अब्दालीने त्यातील सुमारे २५,००० मराठा युद्धकैद्यांना बलुचिस्तानातील मित्र शासक मीरा नासीर खान नुरी याच्याकडे भेट म्हणून दिले. ही भेट नव्हे, तर एका पराभूत सत्तेच्या माणसांचे विस्थापन होते. ही मंडळी मायभूमीपासून हजारो किलोमीटर दूर, परक्या संस्कृतीत, परकीय शासनाखाली पुन्हा जीवन जगण्यास भाग पाडली गेली.

बलुचिस्तानात नवीन आयुष्याची सुरुवात

मीरा नासीर खानने या मराठा कैद्यांना वेगवेगळ्या बलुच जमातींमध्ये विभागले, बुगती, मर्री, गुरचानी, मझारी, रायसानी अशा कबीलाई समाजांमध्ये त्यांचे नव्याने समावेश झाला. काहींनी शेती केली, काहींनी सैन्यात सहभाग घेतला. पण त्यांनी एक गोष्ट कायम जपली, मराठी संस्कृती आणि ओळख.

आज २५० वर्षांनंतरही, बलुचिस्तानमधील अनेक जमातींमध्ये ‘मराठा’ ही उपजात दिसून येते. बुगटी मराठ्यांमध्ये ‘दरुरग मराठा’ आणि ‘साऊ (शाहू) मराठा’ ही दोन महत्वाची उपशाखा आहेत. ‘शाहू’ हे छत्रपती शाहू महाराजांच्या नावावरून आलेले असून, पेशवानी नावही आजही बलुच मराठ्यांमध्ये प्रचलित आहे.

"आई", "पेशवा", आणि मराठी संस्कृतीचा श्वास

बलुची भाषा मराठीशी काही अंशी साम्य राखते. उदाहरणार्थ, शाहू मराठ्यांमध्ये आजही "आई" या शब्दाचा नेमका उच्चार मराठमोळ्या पद्धतीने होतो. घरांमध्ये अनेक जुन्या शब्दांचा उपयोग आजही सुरू आहे. या जमातींनी इस्लाम धर्म स्वीकारलेला असला, तरी त्यांच्या सामाजिक रचनेत आणि लग्न समारंभात मराठी संस्कृतीचे ठळक चिन्हे आजही जिवंत आहेत.

हळद लावणे

घाणा भरवणे

माप ओलांडणे

गाठ बांधणे

या सर्व प्रथा बलुच मराठ्यांच्या विवाहात दिसून येतात. म्हणजेच धर्म बदलला, स्थान बदललं, पण संस्कृतीचा गाभा टिकवला गेला.

परक्या मातीत आपल्या मुळांची जपणूक

या मराठ्यांनी आपलं आयुष्य बलुचिस्तानात घडवलं, मुलांना शिकवलं, घरं उभारली. पण २५० वर्षांनंतरही त्यांची मायभूमीविषयीची आस संपलेली नाही. “आम्ही मराठे आहोत, आमचं मूळ महाराष्ट्र आहे,” हे ते अभिमानाने सांगतात. अनेक बलुच मराठे महाराष्ट्रात नातेवाइकांच्या शोधात यायचा प्रयत्न करतात, तर काहींनी भारत सरकारकडे ओळख मिळवण्यासाठी संपर्कही साधला आहे.

इतिहासाचं विस्मरण नको, ही आपलीच माणसं आहेत!

आज जरी ते परक्या मातीत स्थायिक झाले असले, तरी ते आपलेच आहेत, शिवबांचे मावळे, पेशव्यांचे सैनिक, मराठी संस्कृतीचे वारसदार. या गोष्टींची आठवण आपण केवळ इतिहासात नव्हे, तर जिवंत लोककथांमधून, विवाहप्रथांमधून आणि भाषेच्या उच्चारांमधूनही पाहू शकतो.

पराभवाने वाट हरवली, पण ओळख हरवली नाही

पानिपतच्या रणभूमीवर इतिहासाने मराठ्यांना घायाळ केलं. पण बलुचिस्तानात त्या इतिहासाचे जीवंत पुरावे आहेत, ते म्हणजे बलुच मराठे. त्यांनी परिस्थितीपुढे न झुकता नव्या भूमीत नवा जीवनप्रवास स्वीकारला, पण मूळ संस्कृतीशी नातं कायम जोडलं. आज या विस्थापित मराठ्यांच्या कहाणीने आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की, संस्कृती ही केवळ भूगोल नव्हे, तर आत्म्याची जाणीव असते, जी काळाच्या कसोटीतही टिकून राहते.