मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला हरवत क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. इतिहास साक्ष आहे की जेव्हा जेव्हा मुंबईने क्वालिफायर २ जिंकले आहे, तेव्हा त्यांनी फायनलही जिंकली आहे. यंदा पंजाब विरुद्ध मुंबई सामन्यात इतिहास पुनरावृत्ती होणार का?
अहमदाबाद: आयपीएल 2025 चा थरार आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला हरवत थेट क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. आता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना पंजाब किंग्सशी दोन हात करावे लागणार आहेत. पण एक महत्त्वाचं गणित सध्या चर्चेत आहे. मुंबई जर क्वालिफायर 2 जिंकलं, तर फायनलही त्यांचीच! होय, हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण इतिहास साक्ष आहे की जेव्हा जेव्हा मुंबईने क्वालिफायर २ जिंकले आहे, तेव्हा त्यांनी फायनलही जिंकली आहे.
मुंबईचा क्वालिफायर 2 मधील प्रवास
मुंबई इंडियन्सने आजवर 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्यापैकी 4 वेळा ते क्वालिफायर 2 सामन्यात पोहोचले, म्हणजेच आयपीएलच्या सेमीफायनलसदृश टप्प्यावर. हा सामना "करो या मरो" प्रकारातला असतो – जो जिंकेल, तो थेट फायनलमध्ये; हरलेला थेट स्पर्धेबाहेर.
क्वालिफायर 2 मध्ये मुंबईचा ट्रॅक रेकॉर्ड
मुंबईने या 4 क्वालिफायर 2 पैकी 2 वेळा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही वेळा त्यांनी नंतर फायनलही जिंकली!
2013 –
मुंबईने क्वालिफायर 2 मध्ये विजय मिळवून फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला.
परिणाम: मुंबई – चॅम्पियन!
2017 –
मुंबईने पुन्हा एकदा क्वालिफायर 2 जिंकत फायनलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध लढत दिली आणि रोमांचक विजय मिळवला.
परिणाम: मुंबई – चॅम्पियन!
समीकरण काय सांगतं?
मुंबई इंडियन्सचा ट्रेंड असा सांगतो की जर ते क्वालिफायर 2 पार करतात, तर फायनल जिंकण्याची शक्यता प्रचंड वाढते. 50% यशाच्या टक्केवारीतूनही फायनलमध्ये 100% यश मिळालं आहे!
यंदाही इतिहासाची पुनरावृत्ती?
मुंबईचा संघ सध्या फॉर्मात आहे आणि क्वालिफायर 2 मधील इतिहासही त्यांच्याच बाजूने आहे. पंजाब किंग्सशी त्यांचा सामना रंगतदार होणार आहे. पण जर मुंबईने हा सामना जिंकला, तर त्यांच्या ट्रॉफी जिंकण्याच्या शक्यता इतिहासाच्या आधारावर खूपच प्रबळ वाटतात.
मुंबई इंडियन्ससाठी क्वालिफायर 2 म्हणजे जणू फायनलची पहिली पायरी, जी पार केल्यावर ट्रॉफीची दारं उघडतात! तर तुमचं मत काय? 2025 मध्ये मुंबईचा विजयी इतिहास पुन्हा उजळणार का?