सार

आता ही स्पर्धा पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, फायनल सामना आता ३० मे रोजी खेळवला जाऊ शकतो.

नवी दिल्ली- भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएल २०२५ स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आधी फायनल सामना २५ मे रोजी खेळवण्याचे नियोजन होते, मात्र आता ही स्पर्धा पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, फायनल सामना आता ३० मे रोजी खेळवला जाऊ शकतो.

आतापर्यंत या स्पर्धेतील ७४ पैकी ५८ सामने पूर्ण झाले असून, उर्वरित १६ सामन्यांमध्ये प्लेऑफ आणि फायनल सामन्यांचाही समावेश आहे. बीसीसीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, उर्वरित सामने १६ मेपासून खेळवले जाण्याची शक्यता असून, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद या ठिकाणी उर्वरित सामने पार पडतील.

बीसीसीआयची तयारी आणि नवीन वेळापत्रक बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित झाल्यामुळे फायनल सामना २५ ऐवजी ३० मे रोजी खेळवण्यात येईल. उर्वरित सर्व सामने मर्यादित ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. आज रात्रीपर्यंत सर्व संघांना नवीन वेळापत्रक पाठवण्यात येईल.”

याच अनुषंगाने बीसीसीआयने पंजाब किंग्ज वगळता इतर सर्व संघांतील खेळाडूंना मंगळवारपर्यंत त्यांच्या टीम बेसवर हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कारण आयपीएल पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव शुक्रवारपासून आहे.

खेळाडूंच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह स्पर्धा अचानक स्थगित झाल्यानंतर अनेक विदेशी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मायदेशी परतले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या परतीच्या वेळापत्रकावर आणि उपलब्धतेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. फ्रँचायझींनी आपल्या खेळाडूंना परत बोलावण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आहेत.

सामन्याच्या दरम्यान अचानक निर्णय गुरुवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात १० षटकं झाल्यावर सामना थांबवण्यात आला. स्टेडियममधील लाईट्स अचानक बंद करण्यात आल्या आणि प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर बीसीसीआयने अधिकृतपणे सामना रद्द केला आणि संपूर्ण स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित केली.

बीसीसीआय आणि फ्रँचायझीसमोर मोठं आव्हान आता बीसीसीआय आणि फ्रँचायझीसमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे विदेशी खेळाडूंना पुन्हा वेळेत परत आणणं आणि स्पर्धा सुरळीतपणे पूर्ण करणं. वाढता राजकीय तणाव आणि खेळाडूंच्या हालचालींवरील निर्बंध पाहता, पुढील काही दिवस आयपीएलच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.