सार

या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहलीविरोधात शुक्रवारी (७ जून) बंगळुरूतील कब्बन पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बंगळुरू - चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ (RCB) संघाच्या सत्कार कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली असून या दुर्घटनेत ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहलीविरोधात शुक्रवारी (७ जून) बंगळुरूतील कब्बन पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ही तक्रार ‘नैजा होरतगारारा वेदिके’ या संघटनेचे प्रतिनिधी ए.एम. वेंकटेश यांनी दाखल केली असून, त्यांनी कोहलीसह इतर आयोजकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली असून, ती यापूर्वी नोंदवण्यात आलेल्या FIR सोबत तपासासाठी विचाराधीन ठेवली आहे.

आयोजकांवर रोष

या चेंगराचेंगरी प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक FIR मध्ये आयोजक संस्था RCB फ्रँचायझी, ‘DNA’ इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन (KSCA) च्या प्रशासकीय समितीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रमासाठी आवश्यक ती परवानगी न घेताच हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्यामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि भीषण चेंगराचेंगरी घडली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) खालील कलमांन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत:

कलम १०५ : हत्या न ठरलेल्या गुन्हेगारी मनोवृत्तीने मृत्यू घडवणे

कलम ११५(२) : जाणूनबुजून इजा करणे

कलम ११८(१), ११८(२) सह ३(५): धोकादायक साधनांद्वारे गंभीर इजा करणे व सामूहिक हेतूने तीव्र इजा करणे

कलम १९० : बेकायदेशीर जमाव

कलम १३२ : शासकीय कर्मचाऱ्याला रोखण्यासाठी गुन्हेगारी बळ वापरणे

कलम १२५(अ) आणि १२५(ब): खोटी प्रतिज्ञापत्र सादर करणे व निष्काळजीपणाने मानवी जीव धोक्यात घालणे

हेही वाचा - Uddhav Raj Reunion "आता संदेश नाही, थेट बातमीच देणार!" असे म्हणत उद्धव ठाकरेंनी बातमीच दिली

जखमींनीही केले आरोप

या दुर्घटनेबाबत आणखी दोन तक्रारी कब्बन पार्क पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. त्यातील एक तक्रार रोलँड गोम्स यांनी दाखल केली असून, ते या चेंगराचेंगरीत जखमी झाले होते आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार झाले.

गोम्स यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, “RCB ने सोशल मीडियावर खुले बस मिरवणुकीचे आयोजन जाहीर केले होते. मी आणि माझे मित्र स्टेडियमच्या गेट क्रमांक १७ मधून प्रवेश करत असताना मोठी गर्दी झाली आणि धक्काबुक्कीमुळे माझा खांदा जागेवरून निसटला.”

राजकीय आरोप-प्रत्यारोप

या घटनेवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) शिष्टमंडळाने कब्बन पार्क पोलीस ठाण्यात जाऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरोधात FIR नोंदवण्याची मागणी केली आहे.

भाजपचे विधान परिषद सदस्य एन. रविकुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “RCB विजयानंतर झालेल्या सत्कार कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत. ११ निष्पाप नागरिकांचा मृत्यू आणि ५० हून अधिक लोक जखमी होण्याच्या घटनेला हे दोघेच जबाबदार असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, ही आमची मागणी आहे.”

रविकुमार यांनी असा आरोपही केला की, “बंगळुरूचे निलंबित पोलीस आयुक्त बी. दयानंद यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम ३-४ दिवसांनी घेण्याचा सल्ला दिला होता, मात्र सरकारने तो धुडकावून लावला.”

भाजप नेतेही आले पुढे

या संपूर्ण प्रकरणात सरकारने तिन्ही वेगवेगळ्या तपास समित्या स्थापन केल्या आहेत, यावरही भाजपने आक्षेप नोंदवला.

भाजपचे राज्य सरचिटणीस पी. राजीव यांनी सरकारवर आरोप करत म्हटले की, “जेव्हा पोलीस विभागाने सुरक्षिततेची हमी देण्यास असमर्थता दर्शवली होती, तरीही सरकारने हा कार्यक्रम रेटून लावला. ही सरळ सरळ सत्ता वापरून लोकांच्या जीवाशी खेळण्यासारखी गोष्ट आहे.”

ते पुढे म्हणाले, “गुप्तचर विभागानेही प्रचंड गर्दीचा इशारा दिला होता, पण तरीही परवानगी कशी दिली गेली, याची चौकशी व्हावी.”

या वेळी भाजपचे मुख्य प्रवक्ते आश्वतनारायण, विविध सेलचे संयोजक एस. दत्तात्रय, जिल्हाध्यक्ष एस. हरिश, सप्तगिरी गौडा, कायदेविषयक सेलचे संयोजक वसंतकुमार आदी नेते उपस्थित होते.