- Home
- Mumbai
- Friday Weather Update May 30 आज शुक्रवारी ढगाळ वातावरण राहिल, काही ठिकाणी पावसाची शक्यता
Friday Weather Update May 30 आज शुक्रवारी ढगाळ वातावरण राहिल, काही ठिकाणी पावसाची शक्यता
पावसाने दोन ते तीन दिवस झोडपून काढल्यानंतर अचानक ब्रेक घेतल्याने वातावरणात बदल जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच तापमान वाढण्याची शक्यता आहे
- FB
- TW
- Linkdin
Follow Us
)
२९ मे रोजी सकाळी ८:३० वाजता उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. यामुळे आसपासच्या राज्यांवर याचा प्रभाव जाणवणार आहे. त्याचवेळी राजस्थानच्या आसपास चक्राकार वाऱ्यांचे (सायक्लोनिक सर्क्युलेशन) स्थित्यंतर तयार झाले आहे.
या दोन्ही हवामानीय बदलांमुळे पुढील चार दिवसांमध्ये काही जिल्ह्यांत पावसाला उघडीप मिळण्याची शक्यता आहे. परिणामी, उष्णतेत वाढ होऊन नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
कोकण-गोवा आणि विदर्भात २९ आणि ३० मे रोजी पावसाची शक्यता कायम आहे. मात्र, त्यानंतर या भागात पावसाचा जोर काहीसा कमी होईल. पुढील २४ तासांत हवामानात फारसा बदल होणार नाही, मात्र त्यानंतर तापमानात २ ते ४ अंशांनी घट होऊ शकते.
मध्य भारतात मात्र तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे.
अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि ५० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे अनुभवायला मिळतील.
पुढील तीन ते चार दिवस ही स्थिती कायम राहील, त्यानंतर पावसात विश्रांती मिळेल, असा अंदाज वर्तवला गेला आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि काही ग्रामीण भागांत मागील ४८ तासांत पावसाचा मोठा मारा झाला. काही ठिकाणी गावांचा संपर्क तुटल्याची नोंद आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये पावसाने विश्रांती घेतली असून अधूनमधून हलक्याफुलक्या सरी पडत आहेत.
नवी मुंबई, पनवेल आणि कल्याण-डोंबिवली परिसरातही पावसात विश्रांती दिसून आली. आजही या भागांत हवामान विभागाने हलक्याशा सरींचा अंदाज दिला आहे.
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील सुरडी थोट येथील नदीला पूर आल्याने तब्बल १५ गावांचा संपर्क तुटला आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली.
यंदा महाराष्ट्रात मान्सून वेळेआधी दाखल झाला असला तरी सध्या त्याचा वेग मंदावल्याने विदर्भात मान्सून लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा जोर अनुभवायला मिळाला. भूम, वाशी आणि तुळजापूर तालुक्यांत अचानक जोरदार पावसामुळे अवघ्या अर्ध्या तासात रस्ते जलमय झाले. काही ठिकाणी पाण्यामुळे रस्ते नदीसारखे दिसू लागले आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.