सार

मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संभाव्य युतीबाबतची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा रंगतदार घडामोडी घडताना दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागलेली असताना, मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संभाव्य युतीबाबतची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे उद्योगमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांची आज (मंगळवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी झालेली खासगी भेट.

'शिवतीर्थ'वर अचानक भेट

उदय सामंत हे दुपारी राज ठाकरे यांच्या दादर येथील निवासस्थानी 'शिवतीर्थ' येथे पोहोचले. विशेष म्हणजे, ही उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्यातील अलिकडील काही महिन्यांतील चौथी भेट होती. दोघांमध्ये जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ 'क्लोज डोअर' म्हणजेच बंद दाराआड चर्चा झाली. यामध्ये काय बोलणी झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही चर्चा गंभीर स्वरूपाची होती.

'आधी चर्चा, मग बुके' – राज ठाकरे यांनी टाळली 'ती' चूक

उदय सामंत यांच्या या भेटीमध्ये एक विशेष बाब समोर आली की, नेहमीप्रमाणे स्वागताचा 'बुके' राज ठाकरे यांनी यावेळी घेतला नाही. ही कृती राज ठाकरे यांचा व्यावहारिक बदल म्हणून पाहिली जात आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, यावेळी "आधी चर्चा, मग बुके" हे धोरण ठेवण्यात आले. म्हणजेच, फक्त औपचारिक गोड बोलण्यांपेक्षा आधी ठोस बोलणी, मगच सन्मान, असा दृष्टिकोन मनसेकडून घेतला जात असल्याचं बोललं जातंय.

युतीचे संकेत की राजकीय संदेश

ही भेट मनसे-शिवसेना शिंदे गट युतीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची मानली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. राज ठाकरे यांचा प्रचारात पुन्हा आक्रमक सहभाग दिसून येत आहे. अशावेळी राज ठाकरे आणि सत्ताधारी गटातील प्रमुख मंत्री उदय सामंत यांच्यातील चर्चा ही निवडणूकपूर्व युतीसाठी सकारात्मक संकेत मानली जात आहे.

राज-उद्धव युती अडचणीत? शिंदेंचा 'रोल' ठरणार महत्वाचा

एकीकडे काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. दोघांच्या काही सार्वजनिक वक्तव्यांमधूनही याबाबत सकारात्मक संकेत मिळाले होते. परंतु, त्यानंतर शिंदे गटाच्या हालचालींनी या चर्चेला वेगळीच कलाटणी दिली आहे. त्यामुळे आता राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या संभाव्यतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

शिवसेना (शिंदे गट) आणि मनसेमध्ये जर युती झाली, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना यासाठी अलिप्त राहील का? की काही नवीन समीकरणं पाहायला मिळतील? यावर येणारे काही आठवडे निर्णायक ठरणार आहेत.

राज ठाकरे आणि उदय सामंत यांची ही भेट म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या फेरबदलांची नांदी ठरू शकते. 'राजकीय बुके'पेक्षा 'थेट बोलणी' अधिक महत्त्वाची ठरू लागली आहेत. निवडणुकीपूर्वीच्या या भेटी, चर्चांमधून कोणते नवे गठबंधन तयार होणार, हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.