शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र टीका केली आहे. राऊत यांनी देशातील सुरक्षा स्थिती, दहशतवादी हल्ले, आणि त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मुंबई - शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र टीका केली आहे. राऊत यांनी देशातील सुरक्षा स्थिती, दहशतवादी हल्ले, आणि त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चार ठळक मुद्द्यांमध्ये जाणून घ्या संजय राऊत काय म्हणाले...
दहशतवादी हल्ल्यानंतरही प्रचार आणि कार्यक्रमात सहभाग: संजय राऊत यांनी टीका केली आहे की, जेव्हा देशात दहशतवादी हल्ले होत आहेत, तेव्हा पंतप्रधान मोदी प्रचारसभा आणि चित्रपटसृष्टीतील कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत.
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव: त्यांनी इंदिरा गांधींचं उदाहरण देत मोदींवर आरोप केला की, त्यांनी सैन्यावर जबाबदारी टाकून स्वतः काही ठोस निर्णय घेतलेले नाहीत. त्यांना आवश्यक ती राजकीय इच्छाशक्ती नाही.
जनतेच्या भावनांशी खेळ: राऊत यांनी म्हटले की, मोदी सरकार जनतेच्या भावनांशी खेळत आहे आणि अशा सरकारला पाठिंबा देणे म्हणजे दुर्बलतेचे लक्षण आहे.
गृहमंत्र्यांचा राजीनामा: त्यांनी असा इशारा दिला की, जर दहशतवादी हल्ल्यांना जबाबदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असतील, तर पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घ्यावा.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आणि इतर केंद्रीय मंत्री वारंवार मुंबईला भेट देऊन येथील स्थितीचा आढावा घेत आहेत त्यामुळे संजय राऊत भाजपच्या नेत्यांवर तोंडसुख घेण्याची एकही संधी दवडताना दिसत नाहीत.