Mumbai Rains Update : मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ढगांच्या गडगडाटासह ठिकठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. यामुळे लोकल सेवा देखील विस्कळीत झाली आहे.
Mumbai Rains Update : महाराष्ट्रात मान्सून अखेर दाखल झाला असून राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागांत मुसळधार पावसाचे वातावरण आहे. मात्र, अद्याप मुंबईत मान्सून दाखल झालेला नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या तीन दिवसांत मान्सून मुंबईतही दाखल होण्याची शक्यता आहे.
मुंबई व उपनगरात संततधार पावसाची सुरुवात
रविवारी रात्रीपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने जोर धरला आहे. विशेषतः अंबरनाथ आणि बदलापूर भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. संततधारेमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचू लागले आहे.
⛈️☔ मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
🌊भरती - सकाळी ११:२४ वाजता - ४.७५ मीटर
ओहोटी- सायंकाळी ०५:१८ वाजता - १.६३ मीटर
🌊भरती - रात्री- ११:०९ वाजता - ४.१७ मीटर
ओहोटी- उद्या २७.०५.२०२५ रोजी पहाटे ०५:२१ वाजता - ०. ०४ मीटर
रेल्वे सेवा उशिराने, प्रवाशांचे हाल
पावसामुळे कर्जत, खोपोली आणि बदलापूरवरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्या १५ ते २० मिनिटं उशिराने धावत आहेत. त्याचप्रमाणे, मुंबईहून कल्याण आणि कर्जतकडे येणाऱ्या लोकल सेवा देखील १० ते १५ मिनिटे उशिराने चालत आहेत. परिणामी, सोमवारी सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना विलंबाचा त्रास सहन करावा लागतो आहे.
अंबरनाथ, बदलापूर आणि उपनगरातील काही भागांत विजांच्या कडकडाटामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. काही भागांमध्ये संपूर्ण काळोख पसरला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.याशिवाय मुंबईच्या मध्य आणि पूर्व भागातही पावसाचे आगमन झाले असून, मध्य रेल्वेची वाहतूक संथगतीने सुरू आहे. ट्रॅकवर पाणी साचल्याने गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.
हवामान विभागाकडून अलर्ट
पुढील काही तास धोकादायक हवामान खात्याने पुढील तीन ते चार तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा धोका असून, नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यलो आणि ऑरेंज इशारा मुंबई, ठाणे, पालघर परिसरात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान विभागानुसार, २९ मेनंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.