Monsoon Update : मुंबईत, ठाण्यासह नवी मुंबईला यल्लो अलर्ट दिला गेला आहे. तर कोकणातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
Monsoon Update : राज्यात मान्सूनपूर्व पावसाचं धुमशान सुरू असतानाही मुंबईकरांना पावसाऐवजी मध्येच घामाच्या धारांचा अनुभव येतोय. आज मुंबईसह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, मुंबई, पालघर, नवी मुंबई आणि ठाणे या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज असून तिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत आज ढगाळ वातावरण असून कमाल तापमान सुमारे 33 अंश सेल्सियस आणि किमान तापमान 28 अंश दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार, ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांनी मेगा ब्लॉकसह हवामानाची माहिती घेऊनच घराबाहेर पडावं, असंही सूचित करण्यात आलं आहे.
पालघरमध्येही आज ढगाळ हवामान असून, कमाल तापमान 32 अंश आणि किमान तापमान 27 अंश दरम्यान राहणार आहे. या भागात देखील यलो अलर्ट जारी असून, जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. ठाणे आणि नवी मुंबईतही आज पावसाचा अंदाज देण्यात आला असून, वीजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यांसह हलक्याफुलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
दरम्यान, राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली असतानाही मुंबईला मात्र मागील काही दिवसांपासून बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी पावसाने चकवा दिला होता. हवामान विभागाकडून सतत पावसाचा इशारा दिला जात असला तरी प्रत्यक्षात मुंबईकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. आज मात्र पुन्हा एकदा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याने मुंबईकरांच्या नजरा आकाशाकडे लागलेल्या आहेत.