सार

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, सध्याच्या साठ्यावर अवलंबून राहिल्यास जुलै अखेरपर्यंतच पुरवठा शक्य आहे.

मुंबई: मुंबईकरांसमोर पुन्हा एकदा पाण्याच्या संकटाची छाया घोंगावत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, सध्याच्या साठ्यावर अवलंबून राहिल्यास जुलै अखेरपर्यंतच पुरवठा शक्य आहे.

मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या तलावांमधून रोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणी शहराला पुरवले जाते. मात्र, वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे मागणी सातत्याने वाढत आहे. त्यातच, प्रमुख चार तलावांतील पाण्याची पातळी २० टक्क्यांखालती गेल्याने चिंता आणखी वाढली आहे.

महत्त्वाचे म्हणजे, बीएमसीने अप्पर वैतरणा आणि भातसा तलावातील राखीव १.८१ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा वापरण्यास राज्य सरकारची परवानगी घेतली आहे. तरीही, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जर पावसाळा वेळेवर सुरू झाला नाही, तर पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा सहा टक्क्यांनी अधिक असला, तरी २०२४ मध्येच ५ जूनपासून ५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. सध्या एका टक्के पाणीसाठा सुमारे तीन दिवस पुरतो, अशी महापालिकेची गणिते आहेत.

मुंबई महानगरपालिका परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि पावसाळा सुरू होईपर्यंत साठा टिकवण्यासाठी नियोजन आखले जात आहे. मात्र, पाणी बचतीसाठी नागरिकांनीही सजग राहण्याची गरज आहे. पाऊस लवकर आला तरच मुंबईच्या नशिबी सुटका, अन्यथा नियोजित पाणीकपात अनिवार्य होण्याची शक्यता आहे.