सार

मुंबईतील भाऊचा धक्का परिसरात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांकडून स्थानिक मच्छीमार महिलांवर अरेरावी झाल्याच्या घटनांनंतर, मंत्री नितेश राणे यांनी कठोर इशारा दिला आहे. कोळी समाजाच्या सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांबद्दल चर्चा केली.

मुंबई : मुंबईच्या भाऊचा धक्का परिसरात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांकडून स्थानिक मच्छीमार महिलांवर अरेरावी झाल्याच्या घटनांनंतर, महाराष्ट्राचे मस्त्यविकास मंत्री नितेश राणे यांनी या घुसखोरांविरोधात कठोर इशारा दिला आहे. राणे यांनी भाऊचा धक्का येथे भेट देऊन कोळी समाजाच्या सदस्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्यांबद्दल चर्चा केली.

राणे म्हणाले, "काही दिवसांपूर्वी कोळी समाजाच्या लोकांनी हिंदुत्ववादी संघटनांना पत्र लिहिलं होतं. इथे काही बांगलादेशी आणि रोहिंग्या अवैध पद्धतीने आमच्या कोळी बांधवांना मच्छी विक्री करायला देत नाहीत, एका कोळी भगिनीवर हात उचलण्याची हिंमत केली. त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आज समर्थनार्थ जमलो होतो."

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “बांगलादेशी आणि रोहिंग्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने कडक नियम लावले आहेत. कोणताही बांगलादेशी आणि रोहिंग्या भारतात राहता कामा नये. अशा पद्धतीने हिरव्या सापांची वळवळ आम्ही आमच्या भाऊच्या धक्क्यावर सहन करणार नाही.”

या घटनेच्या पार्श्वभूमीवर, राणे यांनी म्हटले, "हे कराचीमधील बंदर नाही. हे हिंदू राष्ट्रातील बंदर आहे. आमच्या बंदरावर कोणी त्रास देत असेल तर त्यांना कराची बंदरावर कसं पाठवायचं हे आम्हाला चांगलं माहीत आहे."

या वक्तव्यांमुळे स्थानिक मच्छीमार समाजात संतापाची लाट उसळली आहे. राणे यांच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाकडून या घुसखोरांविरोधात कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.