सार

एमटीडीसीने ९ ते १९ आसन क्षमतेच्या जलविमानांद्वारे मुंबई व पुणे यांना गणपतीपुळे, कोयना धरण, उजनी धरण आणि मांडवा यांसारख्या पर्यटनस्थळांशी जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे.

मुंबई - महाराष्ट्रातील पर्यटनाला नवे परिमाण देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) आता पुन्हा एकदा आकाशमार्गाने जोडणी करण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकत आहे. यावेळी, ९ ते १९ आसन क्षमतेच्या जलविमानांद्वारे (Seaplanes) मुंबई व पुणे यांना राज्यातील गणपतीपुळे, कोयना धरण, उजनी धरण आणि मांडवा यांसारख्या सुंदर व प्रसिद्ध पर्यटनस्थळांशी जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे.

मागील अनुभवातून नवी दिशा

हे MTDC चे जलविमान सेवा क्षेत्रातील पहिले पाऊल नाही. २०१४ मध्ये मुंबई-पवना धरण या मार्गावर एक ९-सीटर जलविमान सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, या उपक्रमाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सहारा समूहासोबतची भागीदारी, विविध परवानग्यांमधील विलंब, आणि जेटी बांधणीसाठी ना-हरकत प्रमाणपत्रांच्या (NOC) कमतरतेमुळे हा प्रकल्प काही महिन्यांतच बंद पडला. याचबरोबर, मुंबईतील जुहू ते गिरगाव चौपाटी अशी जलविमान सेवा सुरु करण्याचा प्रस्तावही मंजुरीअभावी अयशस्वी ठरला.

या वेळेस काय बदललंय..

MTDC च्या अधिकाऱ्यांनी यावेळी अधिक यथार्थ आणि दूरदृष्टीपूर्ण नियोजनावर भर दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “आम्ही केवळ व्यवहार्य आणि यशस्वी होऊ शकतील अशाच मार्गांवर लक्ष केंद्रित करत आहोत. आधीच अस्तित्वात असलेले हेलिपॅड्स आणि प्रमाणित जलाशयांचा वापर केला जाईल. याशिवाय नागरी उड्डाण मंत्रालयासोबत समन्वय ठेवून प्रत्येक परवानगी व्यवस्थित घेतली जात आहे.”

मुख्य रूट्स (प्रस्तावित)

मार्ग आणि ठिकाणांचे वैशिष्ट्य

मुंबई ⇄ गणपतीपुळे (रत्नागिरी) कोकणातील सुंदर समुद्रकिनारा

पुणे ⇄ कोयना धरण (सातारा) हिरव्यागार डोंगरांतील जलाशय

पुणे ⇄ उजनी धरण (सोलापूर) पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध

मुंबई ⇄ मांडवा (अलिबाग) मुंबईपासून जलद पर्यटन संभव

सेवेचे उद्दिष्ट काय?

  • पर्यटनस्थळांपर्यंतचा प्रवासाचा वेळ कमी करणे
  • पारंपरिक मार्गाने कोकणात जाण्यास अनेक तास लागतात. जलविमानांमुळे तो वेळ एका तासाच्या आत येऊ शकतो.
  • अनुभवात्मक पर्यटनाला चालना.
  • पाण्यावरून उड्डाण आणि जलाशयात उतरण्याचा अनोखा अनुभव पर्यटकांसाठी आकर्षक ठरणार.
  • स्थानिक अर्थव्यवस्थेला गती.
  • स्थानिक रहिवाशांसाठी रोजगार, पर्यटन व्यवसाय आणि सुविधा यांना चालना मिळणार.
  • शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन.
  • प्रमाणित आणि नियंत्रित मार्गांद्वारे नैसर्गिक सौंदर्याचे जतन करत पर्यटन वाढवण्याचा मानस.

खासगी सहभाग आणि निविदा प्रक्रिया

MTDC ने या प्रकल्पासाठी खासगी क्षेत्रातील अनुभवी विमान कंपन्यांना निविदा मागवून सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं आहे. कंपन्यांना, त्यांच्या सेवेचा दर्जा, विमाने आणि सुरक्षा सुविधांवर आधारित निवडण्यात येणार आहे. या भागीदारीद्वारे, सरकार व खासगी क्षेत्र एकत्र येऊन महाराष्ट्राला 'हवाई पर्यटन’ नकाशावर अधोरेखित करतील, अशी अपेक्षा आहे.

हवाई पर्यटन फेऱ्या, एक नवा प्रयोग

MTDC पुढील टप्प्यात "Aerial Tourism" फेऱ्यांची सुरुवात करणार असून यामध्ये पर्यटकांना महाराष्ट्राच्या नैसर्गिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांचे हवाई दर्शन घडवले जाणार आहे.

उदाहरणार्थ:

राजमाची किल्ला व सह्याद्री घाट

लोणावळा, भीमाशंकर परिसर

युनेस्को वर्ल्ड हेरिटेज स्थळे – अजिंठा, वेरूळ

नाशिकच्या द्राक्षबागा आणि गोदावरी खोरे

MTDC च्या या नव्या जलविमान प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला भक्कम बळ मिळू शकते. योग्य नियोजन, सहकार्य आणि तांत्रिक अंमलबजावणी झाली, तर महाराष्ट्र लवकरच भारतात ‘हवाई पर्यटनाची राजधानी’ म्हणून उदयास येऊ शकतो.