राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाने सर्व 48 विभागांना 100 दिवसांचा कामकाजाचा टास्क दिला होता. त्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची उत्कृष्ट भूमिका बजावली आहे.
मुंबई – राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाने सर्व 48 विभागांना 100 दिवसांचा कामकाजाचा टास्क दिला होता. या कालावधीत विभागांनी धोरणात्मक निर्णय, लोकाभिमुख उपक्रम आणि दूरगामी योजना यांची आखणी करत सक्रियपणे काम केले. आता या 100 दिवसांच्या कार्यकाळाचे प्रगतीपुस्तक समोर आले असून भारतीय जनता पक्ष (भाजप) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यांनी आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून या 100 दिवसांच्या कामगिरीचा अहवाल (रिपोर्ट कार्ड) जाहीर केला. भारतीय गुणवत्ता परिषदेने (Quality Council of India) या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन केले असून विविध मानकांवर आधारित सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या यंत्रणांची नावे प्रसिद्ध केली आहेत.
या मुख्य 10 निकषांवर मूल्यमापन झाले:
वेबसाइट सुधारणा
कार्यालयीन सोयीसुविधा
तक्रार निवारण प्रणाली
नागरिकांसाठी सुलभ सेवा
गुंतवणुकीला चालना
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
धोरणात्मक निर्णय
पारदर्शकता
नवउद्यमशीलतेला प्रोत्साहन
जलद प्रशासकीय प्रक्रिया
या मूल्यमापनानुसार खालील यंत्रणांची निवड करण्यात आली:
5 उत्कृष्ट मंत्रालयीन विभागांचे सचिव
5 मंत्रालयीन आयुक्त
5 जिल्हाधिकारी
5 पोलीस अधीक्षक
5 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
4 महापालिका आयुक्त
3 पोलीस आयुक्त
2 विभागीय आयुक्त
2 पोलिस परिक्षेत्राचे महानिरीक्षक
या यादीमुळे शासनाच्या कामकाजात पारदर्शकता, स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमतेचा आग्रह वाढल्याचे संकेत मिळतात.