- Home
- Mumbai
- HBD MH : रक्तरंजित संघर्षानंतर ६५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा झाला जन्म, वाचा अंगावर काटा आणणारा इतिहास
HBD MH : रक्तरंजित संघर्षानंतर ६५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा झाला जन्म, वाचा अंगावर काटा आणणारा इतिहास
मुंबई ः १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला असला तरी त्यावेळी वेगवेगळी राज्ये उदयाला आली नव्हती. प्रचंड संघर्ष आणि रक्तरंजित लढ्यानंतर एकसंध महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.
- FB
- TW
- Linkdin
Follow Us
)
१९५६ च्या राज्य पुनर्रचना कायद्या अंतर्गत कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांची निर्मिती करण्यात आली. भाषेच्या आधारावर या राज्याची निर्मिती करण्यात आली.
यावेळी मुंबईत मराठी, गुजराती आणि हिंदी भाषा बोलणारे लोक राहत होते. मराठी भाषा बोलणार्या लोकांची संख्या सर्वात जास्त होती. तेव्हा मुंबई बॉम्बे प्रांतात होते. त्यामुळे दोन्ही भाषांची वेगवेगळी राज्ये व्हावीत अशी मागणी जोर धरु लागली.
परंतु, दोन्ही भाषकांच्या लोकांना मुंबई आपल्या राज्यात हवी होती. तसेच केंद्र सरकारमध्ये असलेल्या काही लोकांना मुंबई स्वतंत्र राज्य असावे असेही वाटत होते. त्यामुळे पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला द्यायला नकार दिला.
मुंबई महाराष्ट्रात राहणार नाही, अशी माहिती मिळाल्यावर संयमी मराठी लोकांचा पारा चढला. प्रचंड चिड निर्माण झाली. त्याचे रुपांतर रक्तरंजित आंदोलनात झाले.
मुंबईत ठिकठिकाणी चर्चा, बैठका, आंदोलन सुरु झाली. याच वेळी २१ नोव्हेंबर १९५६ रोजी आंदोलकांनी सरकारचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी मुंबई दणाणून सोडली. एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसर्या बाजूने बोरीबंदर येथून मोर्चे निघाले. तेव्हा फ्लोरा फाऊंटन या नावाने ओळखल्या जाणार्या जागी दोन्ही मोर्चे एकत्र आले.
पोलिसांना या लोकांना आवारण कठीण जाऊ लागले. पोलिसांनी सुरवातीला लाठीमार केला. त्यानंतर गोळीबार केला. बॉम्बे प्रांताचे तत्कालिन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचा आदेश दिल्याचे सांगितले जाते. या गोळीबारात १५ जणांचा मृत्यू झाला तर ३०० जखमी झाले.
तेव्हापासून या जागेला हुतात्मा चौक असे नाव पडले. जनतेचा दबाव वाढू लागला. तरीही केंद्र सरकार ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. सरकारने कठोर पावले उचलल्याने आणखी नागरिकांचा मृत्यू झाला.
दुसरीकडे महागुजरातच्या आंदोलनानेही वेग घेतला. त्यामुळे केंद्र सरकारपुढे हा मुद्दा चांगलाच अडचणीचा झाला. अखेर संयुक्त महाराष्ट्र समिती आणि आंदोलकांच्या दबावापुढे केंद्राला झुकावे लागले. १९६० मध्ये महाराष्ट्राचा जन्म झाला. दुसरीकडे गुजरातलाही स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
या संपूर्ण संघर्षात महाराष्ट्रातील १०९ आंदोलकांना आपले बलिदान द्यावे लागले. त्यानंतर सशक्त महाराष्ट्राचा उदय झाला.