सार

कांदिवलीत एका किरकोळ वादातून ७२ वर्षीय रंजन संघानी यांचा त्यांच्या ६५ वर्षीय शेजाऱ्याने चाकूने वार करून खून केला. शेजारी राहणाऱ्या दोघांमध्ये पूर्वीपासूनच वाद होते, पण हाणामारी इतकी झपाट्याने झाली की हस्तक्षेपाची संधी मिळाली नाही.

कधी काळी 'जेष्ठ नागरिक' हा शब्द सन्मानाने उच्चारला जायचा. अनुभव, संयम आणि सहिष्णुतेचे प्रतीक म्हणून पाहिलं जाणारं हे वय आता कुठल्या दिशेने जातंय, हा प्रश्न उपस्थित करणारी एक धक्कादायक घटना कांदिवली पश्चिमेकडून समोर आली आहे.

७२ वर्षीय रंजन संघानी यांचा त्यांच्या ६५ वर्षीय शेजाऱ्याने — अशोक केसवानी यांनी — किरकोळ वादातून चाकूने वार करत खून केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. हे दोघंही एकाच इमारतीत, बालभारती शाळेमागील बसंती भुवनमध्ये, वर्षानुवर्षे शेजारी राहत होते. मात्र, ‘शेजारीपणा’ ही सामाजिक मूल्यांची संकल्पना या घटनेने पुरती हादरवून टाकली आहे.

किरकोळ वाद की दुश्मनी? 

संघानी यांच्या फ्लॅटबाहेर ठेवलेल्या बांधकाम साहित्यावरून वाद पेटला. हे वाद काही क्षणांचे नव्हते. स्थानिकांनी सांगितले, की पाण्याच्या प्रश्नावरून या दोघांमध्ये पूर्वीही अनेक वेळा वाद झाले होते. घरातली कामं, सार्वजनिक जागेचा वापर, अस्वच्छता — हे सर्व विषय थेट वैरात परिवर्तित होतील, हे कुणालाच वाटलं नव्हतं.

एकटेपणा आणि मानसिक अराजक दोघंही वृद्ध, एकटे राहणारे, आणि सामाजिक संवादाऐवजी वाद आणि कुरबुरींमध्ये गुंतलेले. संघानी त्यांच्या बहिणीसोबत राहत होत्या; दोघी अविवाहित. तर केसवानी पत्नीपासून विभक्त असून, त्यांना मुले नाहीत. या घटनेमागे मानसिक आरोग्य, एकाकीपणा, आणि वृद्धावस्थेतील असंवेदनशील संवाद यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो.

शेजाऱ्यांची भूमिका, दुर्लक्ष की असहायता? घटना घडताना काही शेजाऱ्यांनी आरडाओरड ऐकली, पण हाणामारी इतकी झपाट्याने झाली की, हस्तक्षेपाची संधी मिळाली नाही. नंतर रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी रंजन संघानी यांना मृत घोषित केलं.

कायद्याची कारवाई पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच आरोपी केसवानी यांना अटक केली. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.