पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा विचार केल्यास ठाकरे गटाने सरकारवर सडकून टीका केली. मात्र शिंदेंनी हुकुमाचा एक्का टाकत आपला झेंडा उंच रोवल्याचे दिसून येते.
मुंबई ः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर ही संघटना दोन भागांमध्ये विभागली गेली. मात्र या संघटनेचा जीव असलेला बाळासाहेब ठाकरे कुणाचे यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कायम शाब्दिक चकमकी उडत असतात. बाळासाहेबांचा मुलगा असल्याने त्यांच्या विचारांचा आणि संघटनेचा वारस मी असल्याचे उद्धव ठाकरे सांगतात. तर बाळासाहेबांच्या विचारांचा वारस मी असल्याचा दावा एकनाथ शिंदे करतात. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा विचार केल्यास ठाकरे गटाने सरकारवर सडकून टीका केली. मात्र शिंदेंनी हुकुमाचा एक्का टाकत आपला झेंडा उंच रोवल्याचे दिसून येते.
पहलगाम हल्ल्यावरुन सध्या रान पटले आहे. भारताने अत्यंत महत्त्वपूर्ण असा सिंधू जल करार रद्द केला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या घशाला कोरड पडणार असल्याचे दिसून येते. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच मोडकळीस आली आहे. त्यात पाण्याअभावी शेतीनेही साथ सोडली तर पाकिस्तानला उपासमार होईल हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे बिलावल भु्ट्टो यांनी सिंधूतून एकतर पाणी वाहेल किंवा भारतीयांचे रक्त असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. भारतात सर्वात जास्त या हल्ल्याची झळ महाराष्ट्राला बसली आहे. त्यामुळे या हल्ल्याची परिणाम राज्यात दिसून येत आहेत. राजकीय पक्षांकडून ठिकठिकाणी निषेध सभा घेतल्या जात आहेत.
या हल्ल्यासंदर्भात ठाकरे गटाने शिंदे गटाचा समावेश असलेल्या राज्य सरकारवर कडाडून प्रहार केला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक जमले असताना त्यांना सुरक्षा का पुरविली नाही, असा रोकडा सवाल विचारला आहे. तर मोदी सरकारच्या काश्मिर डिप्लोमसीचे काय झाले, अशीही विचारणा केली आहे.
परंतु, एका निर्णयाने एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर मात केल्याचे दिसून येते. पर्यटकांवर हल्ला झाला तेव्हा सय्यद आदील हुसैन शाह याने जिवाची बाजी लावून प्रतिकार केला. एका दहशतवाद्याची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी दहशतवाद्यांचा गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. त्याचे कुटुंबीय अतिशय हलाखीचे जिवन जगत असून घरात तो एकमेव कमावता होता. त्यामुळे त्याला राज्य किंवा केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी करण्यात येत होती.
सय्यद शाहला पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर करुन एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मात केली आहे. शाह मुस्लिम असला तरी त्याने पर्यटकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करुन माणुसकीचे दर्शन घडवले आहे. त्यामुळे भारतीयांच्या मनात त्यांच्याविषयीचा आदर प्रचंड वाढला आहे. त्याच्या कुटुंबीयांना मदत केल्याने शिंदे यांच्याविषयीच्या भावनाही सकारात्मक झाल्या आहेत. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांनीही हाच निर्णय घेतला असला असे काही शिवसैनिक सांगत आहेत.
एकिकडे उद्धव ठाकरे सहकुटुंब विदेशात गेल्याचा प्रचार सोशल मीडियावर केला जात आहे. एकढा मोठा हल्ला झाला तेव्हा ठाकरे कुटुंबी विदेशात कसे काय जाऊ शकते, असा सवाल केला जात असताना एकनाथ शिंदे यांनी केलेली मदत निश्चितच राजकीय वरचढ सिद्ध करणारी आहे.
-------------------------------