Chhatrapati Sambhaji Maharaj ४० दिवस क्रूर अत्याचार, जीभही छाटली, तरी बदलला नाही धर्म
१५ मार्च २०२५, आज राष्ट्राच्या गौरवगाथेत तेजस्वी अध्याय लिहिणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती! शंभूराजे हे केवळ एक वीर राजा नव्हते, तर ते स्वराज्याची तलवार, धर्मासाठी हसत हसत प्राण देणारा धर्मवीर होते. चला तर आज त्यांच्या पराक्रमाला उजाळा देऊया!
- FB
- TW
- Linkdin
Follow Us
)
आई गेली, पण जिजाऊसारखी आधारशिला लाभली
१६५७ मध्ये जन्मलेल्या संभाजीराजांचे बालपणच दु:खाने सुरू झाले. ते केवळ २ वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्री सईबाईंचे निधन झाले. या दु:खद घटनेनंतर त्यांचे संगोपन आणि शिक्षण राजमाता जिजाऊ यांच्या मायेच्या छायेखाली घडले. जिजाऊंनी लहान वयातच संभाजीराजांना राजकारण, युद्धकला आणि नीतीशास्त्र शिकवले.
१५ व्या वर्षी १३ भाषा, अद्वितीय बौद्धिक सामर्थ्य
संभाजीराजे केवळ तलवारबाज नव्हते, तर थोर विद्वान होते. केवळ १५व्या वर्षी १३ भाषांमध्ये ते पारंगत होते. मराठी, हिंदी, संस्कृत, फारसी, पोर्तुगीज यांसह अनेक भाषा त्यांनी आत्मसात केल्या. अंबरच्या राजासोबत तहाच्या निमित्ताने त्यांना मुघल शिबिरात पाठवले गेले होते, तेथेच त्यांना विविध राजकीय आणि सैन्य रणनीतींचा अभ्यास करता आला.
१६८१, स्वराज्याचा दुसरा छत्रपती
१६ जानेवारी १६८१ रोजी रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. वडिलांच्या वारशाची धुरा त्यांनी खांद्यावर घेतली. औरंगजेबाचे प्रचंड सैन्य, देशातील गद्दार सरदार, आणि अंतर्गत ताणतणाव असतानाही त्यांनी स्वराज्याची पताका अभिमानाने उंच ठेवली.
१०० हून अधिक लढाया, अजिंक्य योद्धा
छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे १२० लढाया लढल्या आणि प्रत्येक लढाईत विजय मिळवला. त्यांच्या विरोधात असणाऱ्या मुघलांची सैन्यसंख्या मराठ्यांपेक्षा १५ पट अधिक असली तरी त्यांनी शौर्य, बुद्धिमत्ता आणि धैर्याने अनेक मोठमोठे किल्ले आणि क्षेत्रं राखली.
शंभूराजांचा बलिदान, धर्म न सोडणारा योद्धा
इ.स. १६८९ मध्ये संगमेश्वर येथे मुघलांनी गुप्त हल्ला करून संभाजीराजांना जिवंत पकडले. गणोजी शिर्केच्या गद्दारीने मुघलांना यश मिळाले. संभाजी महाराज आणि त्यांचे स्नेही कवी कलश यांना बहादुरगड येथे औरंगजेबाच्या समोर उभं केलं.
औरंगजेबाने धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे आमिष दाखवले. पण संभाजीराजांनी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर त्यांच्यावर ४० दिवस क्रूर अत्याचार करण्यात आले. अखेर ११ मार्च १६८९ रोजी तुळापूर येथे त्यांच्या देहाचे तुकडे करण्यात आले.
शंभूराजांची जयंती म्हणजे प्रेरणेचा पर्वत
छत्रपती संभाजी महाराजांचा संपूर्ण जीवनप्रवास हा धैर्य, निष्ठा, बुद्धिमत्ता, आणि अपरिमित राष्ट्रभक्तीने परिपूर्ण होता. जरी त्यांचे आयुष्य कमी काळाचे होते, तरी त्यांचा प्रभाव अनंत काळासाठी भारतीय मनावर कोरला गेला आहे.