या भीषण दुर्घटनेनंतर एअर इंडियाचे मालक असलेल्या टाटा समूहाने एक मोठा निर्णय घेतला आहे. टाटांकडून अपघातात प्राण गमावलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
अहमदाबाद - एअर इंडियाच्या लंडनकडे जाणाऱ्या AI-171 या विमानाचा आज दुपारी टेकऑफनंतर काही क्षणातच अहमदाबादमधील मेघानगर भागात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत २४२ प्रवासी व कर्मचारी होते, ज्यातील बहुसंख्य जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या शोकांतिकेमुळे संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या भीषण दुर्घटनेनंतर एअर इंडियाचे मालक असलेल्या टाटा समूहाने एक मोठा निर्णय घेतला आहे. टाटांकडून अपघातात प्राण गमावलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. या घोषणेमुळे अनेक कुटुंबांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
टाटा समूहाची संवेदना आणि मदतीची घोषणा
टाटा समूहाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक भावनिक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. या निवेदनात म्हटलं आहे :
"Air India Flight 171 या भीषण अपघातामुळे आम्ही अत्यंत व्यथित आहोत. या शोकपूर्ण घटनेवर कोणताही शब्द आमच्या दुःखाची तीव्रता व्यक्त करू शकत नाही. मृतांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या प्रार्थना आणि भावना आहेत. टाटा समूहाकडून प्रत्येक मृत प्रवाशाच्या कुटुंबाला ₹1 कोटी रुपयांची मदत दिली जाईल."
"तसेच जखमी प्रवाशांच्या वैद्यकीय उपचाराचा पूर्ण खर्च टाटा समूह उचलणार असून, त्यांना आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या सुविधा आणि मदत पुरवण्यात येईल. याशिवाय, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या उभारणीतही टाटा समूह सहकार्य करणार आहे. आम्ही या दुर्दैवी काळात पीडित कुटुंबांच्या आणि संपूर्ण समुदायाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत," असेही निवेदनात नमूद आहे.
पीडितांच्या नातेवाईकांसाठी विशेष उड्डाणे
दरम्यान, एअर इंडियाने दिल्ली आणि मुंबई येथून विशेष मदतीची उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. या उड्डाणांमधून अपघातग्रस्त प्रवाशांचे नातेवाईक आणि एअर इंडियाचे कर्मचारी अहमदाबादमध्ये पोहोचू शकतील. या उड्डाणांच्या वेळापत्रकाची माहिती एअर इंडियाच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.