देशाच्या आर्थिक राजधानीत एक दिलासादायक वन्यजीवविषयक माहिती समोर आली आहे. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्यालगतची आरे वसाहत हे क्षेत्र आता तब्बल ५४ बिबट्यांचं घर बनलं आहे.
मुंबई - देशाच्या आर्थिक राजधानीत एक दिलासादायक वन्यजीवविषयक माहिती समोर आली आहे. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्यालगतची आरे वसाहत हे क्षेत्र आता तब्बल ५४ बिबट्यांचं घर बनलं आहे. महाराष्ट्र वन विभाग आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी (WCS) यांच्या संयुक्त अभ्यासातून ही माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे या ५४ बिबट्यांमध्ये ४ पिल्लांचाही समावेश आहे. ही वाढ २०१४-१५ मधील ३१ बिबट्यांच्या तुलनेत २३ ने जास्त आहे.
वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ही वाढ महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मुंबईसारख्या दाट लोकवस्तीतही बिबट्यांसारख्या मोठ्या शिकारी प्राण्यांचं अस्तित्व सुरक्षित राहिलं आहे हे निसर्ग आणि मानवाच्या सहअस्तित्वाचं जिवंत उदाहरण ठरतं.
सखोल अभ्यास व तांत्रिक पद्धतीचा वापर
फेब्रुवारी ते जून २०२४ या कालावधीत वन विभाग आणि डब्लूसीएसने कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून विस्तृत सर्वेक्षण केलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे वसाहत आणि तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य या तीन ठिकाणी हे निरीक्षण पार पाडण्यात आलं. विशेष म्हणजे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या सर्वेक्षणासाठी प्रशिक्षण घेतलं आणि सक्रिय सहभाग नोंदवला.
अभ्यासातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार:
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आरे वसाहतीत: ५४ बिबटे – यामध्ये ३६ मादी, १६ नर, आणि ४ पिल्ले.
तुंगारेश्वर अभयारण्यात: ३ प्रौढ बिबटे.
तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहिलं, तर २०१४-१५ मध्ये याच भागात कॅमेरा ट्रॅपद्वारे केलेल्या पहिल्या सर्वेक्षणात केवळ ३१ बिबटे होते – १६ मादी, १० नर आणि ५ अनिश्चित लिंगाचे.
दाट लोकवस्तीतील सहअस्तित्वाचं उदाहरण
मुंबईसारख्या वेगाने शहरीकरण होत असलेल्या शहरात, बिबट्यांसारख्या शिकारी प्राण्यांचं अस्तित्व हे अत्यंत दुर्मीळ आणि महत्त्वाचं आहे. यामुळे निसर्गाचं संतुलन राखलं जातं आणि जैवविविधतेला चालना मिळते.
"दाट लोकवस्तीतही बिबट्याचं अस्तित्व टिकून आहे हे फार महत्त्वाचं आहे. हा अधिवास जपणं किती आवश्यक आहे हे या अभ्यासातून स्पष्ट होतं. अशा अभ्यासामुळे वन्यप्राण्यांविषयी अचूक माहिती मिळतेच, पण त्याचबरोबर त्यांचा अधिवास संवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना राबवता येतात," असं अनिता पाटील, वन संरक्षक आणि संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली यांनी स्पष्ट केलं.
भविष्यासाठी मार्गदर्शन
हा अभ्यास वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाचं दस्तऐवजीकरण करतो आणि सरकार व पर्यावरण संरक्षक संघटनांना भविष्यातील संरक्षण धोरण ठरवण्यासाठी दिशादर्शक ठरतो. या अहवालातून असे संकेत मिळतात की शहरीकरण आणि जैवविविधता एकत्र नांदू शकतात, फक्त त्यासाठी सद्भाव आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे.
या अभ्यासातून मिळालेल्या माहितीचा उपयोग पुढे बिबट्यांचे अधिवास जपण्यासाठी, मानव-बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी, आणि पर्यावरण संरक्षणाच्या व्यापक दृष्टीने केला जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.