सार

मुळशीतील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या सुनेच्या आत्महत्येनंतर तिच्या 9 महिन्यांच्या बाळाचे भविष्य अनिश्चित. कुटुंबीयांनी हुंड्याचा आरोप केला असून, बाळाची कस्टडी मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे.

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे मुळशीतील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यावर तिच्या कुटुंबीयांनी या मृत्यूमागे हुंड्याचा छळ असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, वैष्णवी गेल्यानंतरही तिच्या कुटुंबीयांची वेदना संपलेली नाही. आता त्यांना काळजी लागली आहे ती वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या तान्ह्या बाळाची जो अजूनही तिच्या माहेरच्या माणसांपासून दूर आहे.

"माझी मुलगी गेली, पण तिचा जीव तिच्या बाळात होता..."

वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या आर्त भावना मांडल्या. “माझी मुलगी गेली, आता तिच्या आत्म्याला तरी शांतता द्या. तिचा जीव तिच्या बाळात होता. त्या बाळाला आम्ही पुन्हा जवळ घेणं ही आमची एकच मागणी आहे,” असं ते म्हणाले.

पिस्तुल दाखवून धमकीचा आरोप

वैष्णवीच्या बाळाला आणण्यासाठी तिचे चुलते गेले असता, निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीने त्यांना पिस्तुल दाखवून धमकावले, असा गंभीर आरोपही कस्पटे यांनी केला आहे. हा प्रकार आणखीच धक्कादायक असून, त्या तान्ह्या जीवाला कोणत्या वातावरणात ठेवलं जातंय, हे प्रश्न उपस्थित करणारा आहे.

"दहा दिवस झाले... तरी बाळ आम्हाला मिळालं नाही"

वैष्णवीला जाऊन आता दहा दिवस होत आले. पण तिचं बाळ अजूनही हगवणे कुटुंबाच्या ताब्यातच आहे. "आमचं पोलीस प्रशासनाला आवाहन आहे – ते बाळ आम्हाला परत मिळावं. माझी मुलगी गेली, पण आता तिच्या बाळालाही दूर ठेवून तिला अजून किती त्रास देणार?" असा हृदयद्रावक प्रश्न वैष्णवीच्या वडिलांनी उपस्थित केला आहे.

वैष्णवीचा मृत्यू हा केवळ एका तरुणीचा अंत नव्हे, तर एका आईच्या स्वप्नांचा, एका कुटुंबाच्या आधाराचा आणि एका तान्ह्या बाळाच्या सुरक्षित भविष्यातील विश्वासाचा अंत आहे. तिच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी, तिच्या बाळाला योग्य ठिकाणी पोहोचवणं ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.