Vaishnavi Hagawane Death : 23 वर्षांची वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सात दिवसानंतर अखेर सासरे आणि दीराला अटक झाली आहे. यावर अंजली दमानिया यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.
Vaishnavi Hagawane Death : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा माजी पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून त्यांच्या 23 वर्षीय सुनबाई वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली. जमीन खरेदीसाठी आर्थिक मागणी पूर्ण न झाल्यामुळे वैष्णवीवर सतत दबाव टाकला जात होता. या त्रासाला कंटाळून तिने 16 मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. याप्रकरणी तिचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. मात्र सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे सात दिवसांपासून फरार होते. अखेर पुणे पोलिसांनी 23 मे रोजी पहाटे या दोघांना अटक करण्यात यश मिळवलं.
या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया यांनी म्हटले की, “अटक झाल्याचं ऐकून समाधान वाटलं, मात्र पुण्यासारख्या शहरात हे दोघे सहा-सात दिवस कायद्यापासून दूर राहू शकतात, हे चिंताजनक आहे. कोणीतरी त्यांच्या पाठीशी नक्की उभं होतं. इतक्या मोठ्या प्रमाणावर जनतेनं आवाज उठवल्यानंतरच त्यांना अटक झाली. हगवणे कुटुंबाला अशी शिक्षा मिळाली पाहिजे की, संपूर्ण महाराष्ट्रात याचा धसका घेतला जाईल, असं ठाम मत व्यक्त केलं. वैष्णवीला आपण वाचवू शकलो असतो, तर हे टोकाचं पाऊल टळलं असतं", असंही त्यांनी नमूद केलं.
वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी आणि चांदीची भांडी दिली गेली होती. मात्र, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासरच्यांनी किरकोळ कारणांवरून भांडण सुरू केलं. तिच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला आणि मानसिक व शारीरिक त्रास सुरु झाला. पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला. पोस्टमार्टम अहवालात तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रण आढळले. पोलिसांच्या तपासानंतर अखेर सात दिवसांनी राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली असून, आता या प्रकरणात न्याय मिळावा, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.