सार

देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून, महाराष्ट्रात एका दिवसात ६५७ नवे रुग्ण आढळले आहेत. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्याचे बहुतेक रुग्ण हे सौम्य लक्षणे असलेले आहेत.

नवी दिल्ली | प्रतिनिधी काही काळ शांततेने गेलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा उच्छाद मांडायला सुरुवात केली आहे. देशात दररोजच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असून, महाराष्ट्र पुन्हा एकदा कोरोनाच्या आकड्यांमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. एकाच दिवसात सुमारे २४०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, आणि त्यामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

देशभरात एका दिवसात २३९५ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर महाराष्ट्रात एकट्या दिवशी तब्बल ६५७ रुग्णांची भर पडली. या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभाग सतर्क झाला असून, पुन्हा एकदा मास्क, सॅनिटायझर आणि गर्दी टाळण्याच्या सूचना देण्याचे संकेत आहेत.

आरोग्य तज्ज्ञांनी यावेळी स्पष्ट केलं आहे की, सध्याचे बहुतेक रुग्ण हे सौम्य लक्षण असलेले आहेत. मात्र, लक्षणं दुर्लक्षित करणे किंवा चाचणी टाळणे यामुळे वास्तव चित्र समोर येत नाही. त्यामुळे लोकांनी पुन्हा एकदा खबरदारी पाळण्याची गरज आहे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने हॉस्पिटल्सना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. लसीकरणाची स्थिती, ऑक्सिजन स्टॉक आणि बेड्सची उपलब्धता यांचीही नव्याने पाहणी सुरू करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नसला, तरी आरोग्य विभागाने त्याचा वापर अनिवार्य करण्याच्या शक्यतेकडे संकेत दिले आहेत. विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि सहव्याधी असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आहे.