सार

पुण्यातील सदाशिव पेठेत रविवारी सकाळी एका चारचाकी वाहनाने नियंत्रण गमावून रस्त्यावर उभ्या असलेल्या MPSC परीक्षार्थींसह १२ जणांना धडक दिली. गाडी चालवणाऱ्या व्यक्तीकडे परवाना नव्हता आणि तो गाडी शिकत होता.

पुणे | प्रतिनिधी रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांसाठी सुरक्षितता ही फक्त बोर्डावर लिहिलेली संकल्पना बनत चालली आहे का हा प्रश्न हल्ली पडतो. पुण्यातील सदाशिव पेठेतील भीषण अपघाताने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाहन चालवण्याचं नीट प्रशिक्षण नसतानाही गाडी चालवणाऱ्या व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे तब्बल १२ जण जखमी झाले आहेत.

रविवारी सकाळी सदाशिव पेठेमधील गजबजलेल्या रस्त्यावर एका चारचाकी वाहनाने अचानक नियंत्रण गमावलं आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना धडक दिली. हे विद्यार्थी MPSC परीक्षेची तयारी करत होते. दुर्दैव म्हणजे गाडी चालवत असलेल्या व्यक्तीस वाहन चालवण्याचा परवाना नव्हता आणि तो शिकत होता, असा धक्कादायक तपशील समोर आला आहे.

अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये विद्यार्थी, स्थानिक रहिवासी आणि वृद्धांचा समावेश आहे. काहींना गंभीर दुखापत झाली असून पारस हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वाहनचालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. वाहन मालकावरही कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे, कारण परवाना नसलेल्या व्यक्तीस गाडी चालवायला देणं हाही कायद्याच्या चौकटीबाहेरचा गुन्हाच आहे.