सार

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर विवाहबाह्य संबंधांचे आरोप झाल्याने त्यांनी मौन सोडले आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे.

पुणे | प्रतिनिधी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवे आरोप व चर्चांचा भडका उडाल्याच्या पार्श्वभूमीवर, अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी अखेर मौन सोडलं आहे. त्यांच्यात आणि शशांक सुशील यांच्यात विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप काही माध्यमांमध्ये केले जात होते. मात्र, दीपाली सय्यद यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, “ज्या नात्याचं अस्तित्वच नाही, त्यावर चर्चा करणे हास्यास्पद आहे,” असे परखड मत मांडले आहे.

एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या, “कोणत्याही प्रकरणात काहीही निष्पन्न झालं नसताना, कुणालाही मध्ये खेचणं म्हणजे मानसिक खच्चीकरण आहे. मी स्वतः एक महिला असून, अशा चुकीच्या पद्धतीने कुणाचा संबंध लावणं हे एका प्रकारचं विकृत समाधान आहे.”

प्रकरण सध्या तपासाधीन असून, अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. मात्र, सोशल मीडियावर दीपाली सय्यद यांचं नाव घेत होत असलेले उलटसुलट दावे आणि चर्चांमुळे अभिनेत्रीने थेट उत्तर देणं पसंत केलं. “मी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवते. कोणाला दोषी ठरवायचं का नाही, हे ठरवण्याचा अधिकार समाजाला नाही. आपण केवळ वाट पाहावी, न्याय होऊ द्यावा,” असंही त्या म्हणाल्या.

दीपाली सय्यद यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केलं की, “माझं नाव या प्रकरणात विनाकारण ओढलं जात आहे. काही लोकांना प्रसिद्धी हवी आहे किंवा एखाद्याचं लक्ष दुसरीकडे वळवायचं आहे. अशा गोष्टींना मी बळी पडणार नाही.”