सार

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटल्यानंतर, शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांची पुण्यात एकाच टेबलावर झालेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. ही भेट माजी आमदार सुरेश दादा भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झाली असली तरी, तिचा राजकीय अर्थ लपलेला नाही. 

पुणे | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या ऐतिहासिक फाटल्यानंतर दोन्ही गट वेगवेगळ्या मार्गांनी राजकीय प्रवास करत असतानाच, काल पुण्यात घडलेली एक बैठक चर्चेचा विषय ठरली आहे. शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील हे तिघे एकाच टेबलावर दिसले आणि ‘पोलिटिकल पिठल्यात’ नव्या भाजणीची चाहूल लागली.

ही भेट माजी आमदार सुरेश दादा भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झाली, असे सांगण्यात येत असले तरीही, या भेटीतला राजकीय दृष्टीकोन कोणाच्याही नजरेतून सुटलेला नाही. एकत्र फोटो, शरद पवारांचा शांत चेहरा, अजित पवारांचा औपचारिक नमस्कार, आणि जयंत पाटील यांचा संयत हावभाव — या सगळ्या दृश्यांमागे मौनाचा अर्थ लपलेला आहे.\ शरद पवार यांचं संपूर्ण राजकीय आयुष् विचारसरणीशी तडजोड न करता लढण्याचं उदाहरण राहिलंय. दुसरीकडे, अजित पवार हे सत्ताधारी भाजपसोबत युती करून वेगळ्या वाटेवर गेले. जयंत पाटील अजूनही शरद पवार यांच्यासोबत निष्ठेनं उभे आहेत. या तिघांचं एकत्र येणं ही केवळ वाढदिवसाची भेट होती का, की 2024 लोकसभा निकालानंतरच्या नव्या समीकरणांची सुरुवात, हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, ही बैठक म्हणजे ‘पोलिटिकल डॅमेज कंट्रोल’ची शक्यता असलेली सुरुवात असू शकते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर विरोधी पक्षांमध्ये फेरजुळणी होत असेल, तर पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीचे गट पुन्हा एकत्र येऊ शकतात, असा कयास लावला जातोय. या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडियावर कार्यकर्त्यांमध्ये नव्याने चर्चांना ऊत आला आहे. अनेकांनी “राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का?”, असा प्रश्न उपस्थित केला आहे.