सार

करुणा शर्मा यांनी रुपाली चाकणकर यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवडीवरून सौंदर्याचा मुद्दा उपस्थित करत टीका केली आहे. या टीकेमुळे राजकारणात महिलांच्या कामगिरीऐवजी त्यांच्या सौंदर्यावर चर्चा होण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

राजकारणात पुन्हा एकदा वैयक्तिक टीका, सौंदर्यावरून शाब्दिक हल्ले आणि महिला सन्मानावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या वक्तव्यांनी वातावरण तापलं आहे. करुणा शर्मा-मुंडे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याने वाद पेटला आहे. करुणा शर्मा यांनी आरोप केला की, "रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केवळ त्या सुंदर आहेत म्हणून झाली आहे." हे वक्तव्य केवळ व्यक्तीगत हल्ला नसून, राज्यातील महिला नेतृत्वाच्या मूल्यांकन प्रक्रियेवरच सवाल उपस्थित करणारे ठरत आहे. 

सार्वजनिक क्षेत्रातील महिलांच्या कामगिरीवर चर्चा व्हायला हवी, त्यांच्या सौंदर्यावर नव्हे. एखादी महिला नेता आपल्या कामगिरीमुळे चर्चेत असताना, तिच्या रूपावरून मतप्रदर्शन करणे हे फक्त राजकीय अधःपतनाचं लक्षण नव्हे, तर समाजात खोलवर रुजलेल्या स्त्रीविरोधी मानसिकतेचं प्रतिबिंब आहे. 

महिला आयोग हे संस्थात्मक बळ देण्याचं साधन असताना, त्याच्या नेतृत्वावर अशा टीका होणे म्हणजे संस्थेच्या कार्यक्षमतेवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. करुणा शर्मा यांचे आरोप हे स्वतः महिलांच्या सक्षमीकरणाच्या भूमिकेलाच कमजोर करणारे वाटतात.