सार

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली असून, भाजपाने त्यांच्या पक्षाला दुय्यम वागणूक दिल्याची नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे-पवार सरकार आल्यानंतर लहान पक्षांकडे दुर्लक्ष होत असल्याचेही त्यांनी म्हटले.

मुंबई: काही काळापासून राजकीय शांततेत असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. भाजपाची साथ सोडून त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींची नुकतीच भेट घेतली असून, त्या भेटीच्या निमित्ताने त्यांनी भाजपाविषयी आपली नाराजी थेट बोलून दाखवली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

"सन्मान हवा होता, दुर्लक्ष मिळालं"

महादेव जानकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्या पक्षाला भाजपकडून नेहमीच दुय्यम वागणूक मिळाली. “माझाही एक पक्ष आहे आणि प्रत्येक पक्षाला त्याच्या अस्तित्वानुसार सन्मान मिळालाच पाहिजे. मात्र भाजपाने आमच्याकडे लक्षच दिलं नाही,” असे ते म्हणाले. जानकर यांनी २०१९ मधील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून संपर्क न आल्यामुळे १०० उमेदवार स्वबळावर उभे केल्याचेही सांगितले.

"एकनाथ शिंदे आणि अजित पवार आल्यापासून आमचं महत्त्वच संपलं"

भाजपाच्या नव्या मित्रपक्षांसोबतच्या समीकरणांवर टीका करत जानकर म्हणाले, “एकनाथ शिंदे आणि अजित पवार आल्यापासून भाजपाला लहान पक्षांची गरजच वाटेनाशी झाली. आमचं महत्त्वच कमी झालं.” हेच कारण देत त्यांनी भाजपापासून फारकत घेतल्याचे संकेत दिले.

राहुल गांधींची 'घरगुती' भेट, मिळाला योग्य सन्मान

अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त जानकर यांनी राहुल गांधी यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिलं. या निमित्तानेच दोघांमध्ये विशेष भेट झाली. “राहुल गांधींनी मला कार्यालयात न बोलावता थेट घरी बोलावलं. एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षासारखी वागणूक त्यांनी दिली, त्यामुळे मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो,” असे जानकर यांनी सांगितले.

"ही राजकीय बैठक नव्हती, पण राजकारणाचाही विचार करावा लागेल"

राहुल गांधींबरोबर झालेली चर्चा ही फक्त सामाजिक कारणासाठी होती, असं सांगतानाही जानकर यांनी सूचक भाषेत भविष्यातील राजकीय दिशा स्पष्ट केली. “आज निवडणूक नाही, पण पुढे काय करायचं हे ठरवावं लागेल,” असे ते म्हणाले. याच बैठकीत अखिलेश यादव यांच्याशीही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

"शेतकऱ्यांचे आश्वासन पाळा"

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत जानकर म्हणाले, “सातबारा कोरा करण्याचं जे आश्वासन सरकारने दिलं होतं, ते अद्याप पाळलेले नाही. याबद्दल जनतेला उत्तर द्यावं लागेल.”

महादेव जानकर यांनी राहुल गांधींची भेट घेत भाजपावरील नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. त्यांची ही भूमिका महाराष्ट्रातील आगामी राजकारणात महत्त्वाची ठरू शकते. छोटे पक्ष व विशेषत: शेतकरी हिताच्या मुद्द्यांवर त्यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.