पुणे ते बेंगळुरू प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून पुणे-बेंगळुरू एक्स्प्रेसवे या भव्य प्रकल्पाची योजना आखण्यात आली आहे.
पुणे - पुणे ते बेंगळुरू प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून पुणे-बेंगळुरू एक्स्प्रेसवे या भव्य प्रकल्पाची योजना आखण्यात आली आहे. अंदाजे ७०० किमी लांबीचा हा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवे तयार करण्यासाठी सुमारे ४०,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे पुणे ते बेंगळुरू दरम्यानचा प्रवास केवळ ४ ते ६ तासांत पूर्ण होणार आहे, जो सध्या सरासरी १८ तास लागतो.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
हा एक्स्प्रेसवे पूर्णपणे नव्या मार्गावर (ग्रीनफिल्ड) बांधला जाणार असून, त्यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी २ विशेष एअरस्ट्रिप्स, ५५ उड्डाणपूल (फ्लायओव्हर) आणि २२ इंटरचेंजेस असणार आहेत. वाहनांना येथे १२० किमी/तास वेगाने प्रवास करण्याची मुभा असेल. हा प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल आणि प्रवास सुलभ, वेगवान व सुरक्षित होणार आहे.
कोणते जिल्हे या मार्गावर येणार?
हा मार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एकूण १२ जिल्ह्यांमधून जाणार आहे. महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट, गडग, कोप्पळ, विजयनगर, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूर हे जिल्हे यामध्ये समाविष्ट असतील. या मार्गाची सुरुवात पुणे रिंग रोडवरील कंजाळे येथून होईल.
प्रवासातील बदल
सध्याच्या मार्गाच्या तुलनेत हा नवीन मार्ग सुमारे ९५ किमीने कमी आहे. त्यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे. मुंबई आणि बेंगळुरू दरम्यानचा संपर्क अधिक जलद आणि सुलभ होईल.
आर्थिक आणि सामाजिक फायदे
या प्रकल्पामुळे फक्त प्रवासच सुलभ होणार नाही, तर औद्योगिक, आयटी, वाहतूक आणि पर्यटन क्षेत्रात मोठी वाढ होईल. दोन्ही राज्यांतील जिल्ह्यांचा विकास वेगाने होईल. तसेच, वाहतुकीवरील ताण कमी होईल आणि राष्ट्रीय महामार्ग ४ (NH4) वरील ट्राफिकचा ताण कमी होईल.
आपत्कालीन तयारीसाठी विशेष बाबी
या मार्गावर आपत्कालीन सायरन प्रणाली, सुरक्षा यंत्रणा आणि रेस्क्यू युनिट्स कार्यरत असणार आहेत. युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीत एअरस्ट्रिप्सचा वापर युद्ध विमानांसाठी सुद्धा होऊ शकतो.
पुणे-बेंगळुरू एक्स्प्रेसवे हा प्रकल्प केवळ दोन शहरांना जोडणारा रस्ता नसून, तो दोन राज्यांच्या विकासाला गती देणारा एक मजबूत दुवा ठरणार आहे. नागरिकांसाठी सुरक्षित, वेगवान आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव देणाऱ्या या महामार्गाची प्रतिक्षा आता अधिकच वाढली आहे.