१ मे २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील. यात बीकेसी येथील ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट’ आणि समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा यांचा समावेश आहे.
मुंबई: १ मे २०२५ महाराष्ट्र दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौऱ्यावर असून, ते दिवसभरात अनेक महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. या दौऱ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणारा ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट’. हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कार्यक्रम महाराष्ट्र सरकार आयोजित करत असून, त्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आहे.
मुंबईत AV एंटरटेनमेंट विश्वाचा महाकुंभ
१ ते ४ मे २०२५ दरम्यान होणारा हा AV समिट हे मुंबईला ग्लोबल एंटरटेनमेंट हब म्हणून अधोरेखित करणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार असून, यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, तसेच मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित असतील.
महाराष्ट्र गुंतवणुकीचा आणि पर्यटनाचा हॉटस्पॉट
उदय सामंत म्हणाले की, “महाराष्ट्र हे केवळ हिंदी चित्रपटसृष्टीचे माहेरघर नाही, तर हे परकीय गुंतवणुकीसाठी क्रमांक एकचे राज्य आहे.” भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची परंपरा जपणाऱ्या महाराष्ट्राने अलीकडच्या काळात उद्योग, गुंतवणूक आणि पर्यटन क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली आहे. या AV समिटचे उद्दिष्ट केवळ मनोरंजन नव्हे, तर महाराष्ट्राची संस्कृती, पर्यटन स्थळं आणि औद्योगिक क्षमता यांना जागतिक पातळीवर नेणे हे आहे. त्यामुळे, मुंबईचा हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी ग्लोबल ब्रँड बिल्डिंगचा प्लॅटफॉर्म ठरणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान आणखी एक महत्त्वाचा विकास टप्पा गाठला जाण्याची शक्यता आहे. इगतपुरी ते ठाणे या अंतिम टप्प्यासह समृद्धी महामार्ग पूर्णतः सुरू होणार! मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. ५५,००० कोटी रुपयांचा खर्च, २४ जिल्ह्यांना जोडणारा ७०१ किमी लांबीचा द्रुतगती मार्ग, आणि आता नाशिक-मुंबई प्रवास फक्त २.५ तासांत!
महाराष्ट्र दिनी विकास, संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा संगम पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत हे कार्यक्रम केवळ उद्घाटनापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर ते महाराष्ट्राला ग्लोबल प्लॅटफॉर्मवर नेतात, हे ठामपणे सांगता येईल.