ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पाकिस्तानने स्वर्ण मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचल्याचा दावा संरक्षण सूत्रांनी केला आहे. पाकिस्तानने सोशल मीडियावर खोटा प्रचार करून सिख समाजाच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला.
नवी दिल्ली | प्रतिनिधी ८ मे रोजी भारताने यशस्वीपणे राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईनंतर पाकिस्तानने त्याच्या 'डर्टी गेम'चा नवा अध्याय सुरू केला होता. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताचे लक्ष ऑपरेशन सिंदूरकडे वळलेले असताना पाकिस्तानने पवित्र स्वर्ण मंदिरावर हल्ल्याचा कट आखण्याचा प्रयत्न केला होता.
पाकिस्तानातून चालवल्या जाणाऱ्या सोशल मीडिया हँडल्सवरून भारतविरोधी अफवा आणि खोटा प्रोपगंडा पसरवण्यात आला, ज्यात विशेषतः सिख समाजाच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका कथित ट्विटर पोस्टमध्ये हे दाखवण्यात आलं की, भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर दरम्यान अमृतसरमधील स्वर्ण मंदिराला नुकसान पोहोचवलं, असा खोटा दावा करण्यात आला होता. मात्र भारतीय लष्कराने हे सर्व दावे त्वरित फेटाळून लावले आणि स्पष्ट केले की, अशा कोणत्याही कारवाईत धार्मिक स्थळाला धक्का पोहोचलेला नाही.
या प्रकारातून पाकिस्तानचा उद्देश स्पष्ट दिसतो – भारतात अराजकता पसरवणे, धार्मिक तेढ निर्माण करणे, आणि विशेषतः सिख समाजामध्ये सरकारविरोधात रोष वाढवणे. या सर्व घडामोडी घडत असताना भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी सजग भूमिका घेत पाकिस्तानच्या प्रोपगंडाला उघडं पाडलं.
दरम्यान, संरक्षण विश्लेषकांचे म्हणणे आहे की, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची फौजदारी, कुटिल आणि मानसिक युद्धाची रणनीती आणखी तीव्र झाली आहे. त्यामुळे भारताने आता केवळ प्रत्यक्ष सीमेलाच नव्हे, तर सायबर आणि माहितीच्या युद्धातही सजग राहावं लागणार आहे.