सार

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. यामध्ये सर्वाधिक पर्यटक महाराष्ट्रातील होते. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करण्यात आलीये.

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमावाव लागला. यामध्ये बहुतांशजण पर्यटक होते. मृतांच्या आकडेवारीमधील 6 जण हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे होते. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा करत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामधील राज्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय राज्य सरकारकडून शिक्षण आणि नोकरीमध्ये या कुटुंबांना मदत केली जाईल. जगदाळे कुटुंबातील मुलीला शासकीय नोकरी देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

 

Scroll to load tweet…

याशिवाय हल्ल्यानंतर श्रीनगर येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष विमानाची सोय करण्यात आली होती. यानुसार, जवळजवळ 500 पर्यटक महाराष्ट्रात परतले गेले. याआधी श्रीनगर येथे जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यटकांची भेट घेतली होती. याशिवाय गिरीश महाजन यांनी लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या राज्यातील पर्टकांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पर्यटकांसोबत संवाद साधला होता.