मुंबईत गुप्तपणे राबवण्यात आलेल्या "ऑपरेशन सिंदूर" अंतर्गत १०० हून अधिक संशयित बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. मनसे युवानेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केंद्र सरकारने यावर लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.
मुंबई | प्रतिनिधी मुंबईतल्या अघोषित "ऑपरेशन सिंदूर" प्रकरणावरून आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना युवानेते अमित ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून, मुंबईत वाढलेल्या बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.
मुंबईत अलीकडेच गुप्तपणे राबवण्यात आलेल्या "ऑपरेशन सिंदूर" अंतर्गत सुमारे १०० हून अधिक परप्रांतीय संशयित नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत अनेक जण बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मात्र, या ऑपरेशनविषयी ना राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मिळाले ना स्थानिक पोलिसांकडून माहिती देण्यात आली, यामुळे नागरिकांत संभ्रम आणि भीतीचं वातावरण आहे.
अमित ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, “आपल्या देशात बेकायदेशीररीत्या आलेले नागरिक केवळ शहरांच्या सुरक्षेसाठीच नव्हे, तर देशाच्या एकात्मतेसाठीही धोका ठरू शकतात.” त्यांनी केंद्र सरकारने बेकायदेशीर घुसखोरीबाबत स्पष्ट आणि कठोर धोरण तयार करावे, अशी मागणी केली आहे.
त्याचबरोबर, या घुसखोरांचा वापर राजकीय पक्षांकडून 'व्होट बँक'साठी होतो आहे का, हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता फक्त कारवाई पुरेशी नाही, तर "ओपन आणि पारदर्शक माहितीची गरज आहे," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेस आणि मनसे यांच्यात पुन्हा एकदा घुसखोरीच्या मुद्द्यावरून राजकीय जुंप अपेक्षित आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक गाजण्याची चिन्हं आहेत.