राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचे पुण्यात आकस्मिक निधन झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मृत्यूवर संशय व्यक्त केला असून, धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला आहे.

राजकारण, वाद, आणि आता... एक अनुत्तरित मृत्यू. राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजवणारी घटना घडली आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि वादग्रस्त भूखंड व्यवहारांमध्ये अडकलेले राजेंद्र घनवट यांची पत्नी, मनाली घनवट यांचं सोमवारी पुण्यात आकस्मिक निधन झालं. त्या केवळ ४६ वर्षांच्या होत्या. ज्युपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला, आणि त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मात्र या निधनामागे एक वेगळंच वादळ उसळतंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट मृत्यूवरच संशय व्यक्त करत, तो नैसर्गिक नसून ‘आत्महत्या असण्याची शक्यता’ वर्तवली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “मनाली घनवट यांचा मृत्यू फक्त एक वैद्यकीय घटना नाही, यामागे काहीतरी दडवले जात आहे.”

दमानिया यांचा थेट आरोप – "राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहेत आणि याच व्यक्तीने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत," असा दावा करत त्या म्हणाल्या, “मी स्वतः महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.”

मनाली घनवट यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा दावा अधिकृतरीत्या केला जात असतानाच, त्याच्या पार्श्वभूमीवर उभे राहणारे प्रश्न, वैद्यकीय अहवाल आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे दावे – हे सारेच या प्रकरणाला अधिक गुंतागुंतीचं बनवत आहेत. राजकीय परिणामकारकता: या मृत्यूचा राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता प्रबळ आहे. धनंजय मुंडे यांचं नाव पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.